भुसावळ: शहरातील महत्त्वकांक्षी अमृत योजनेचे काम संथ गतीने होत आहे. या कामामुळे शहरातील रस्ते खूपच खराब झाले असून, नागरिकांचे हाल होत आहेत. याशिवाय प्रस्तावित इतर प्रलंबित कामांना लवकरात लवकर गती मिळावी, याकरिता नगराध्यक्ष रमण भोळे यांच्यासह १२ नगरसेवकांच्या शिष्टमंडळाने राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे तसेच राज्याचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील, जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांची भेट मुंबई येथे घेऊन या समस्या लवकरात लवकर सुटाव्या, यासाठी साकडे घातले.
शहरात विविध प्रश्नी सत्ताधाऱ्यांना विरोधकांचा रोष नव्हे तर स्वकीयांचाही वेळोवेळी आंदोलनाद्वारे घरचा आहेर मिळत आहे.
भुसावळची महत्त्वाकांक्षी अमृत योजना लवकरात लवकर व्हावी, यासह इतर मागण्यांसाठी नगराध्यक्ष रमण भोळे यांच्यासह प्रा. सुनील नेवे, माजी प्रभारी नगराध्यक्ष प्रमोद नेमाडे, वसंत पाटील, किरण कोलते, पुरुषोत्तम नारखेडे, दिनेश नेमाडे, अमोल इंगळे, देवा वाणी, दत्तू सुरवाडे, किशोर पाटील आदींच्या शिष्टमंडळाने मुंबई येथे मान्यवरांची भेट घेतली तसेच माजी महसूल मंत्री एकनाथ खडसे यांची मुंबईत तब्येतीविषयी विचारपूस केली.
मुंबई येथे जयंत पाटील यांना निवेदन देताना रमण भोळे, सुनील नेवे, प्रमोद नेमाडे, किरण कोलते, वसंत पाटील, अमोल इंगळे, दिनेश नेमाडे, कृषी किशोर पाटील ,पुरुषोत्तम नारखेडे आदी.