जळगाव : जिल्ह्यात कुपोषणाचा मुद्दा गंभीर झालेला असताना उपाययोजनांवर आता भर दिला आहे. त्यातच कोरोना काळात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात बंद असलेला पोषण पुनर्वसन विभाग हा पुन्हा एकदा सुरू करण्यात आला आहे. बालरोग व चिकित्सा विभागात ५ खाटांचा हा विभाग असून जिल्ह्यातील कुपोषित बालकांसाठीचे हे केंद्र आहे.
अधिष्ठाता डॉ. जयप्रकाश रामानंद यांच्या उपस्थितीत पोषण पुनर्वसन विभाग पुन्हा एकदा सुरू करण्यात आला. या ठिकाणी कुपोषित बालकांवर उपचार करणे, त्यांची काळजी घेणे यासह डॉक्टरांकडून देखरेख ठेवली जाते.
जिल्ह्यातील कुपोषित बालकांचे आहार आणि औषधोपचाराने पुनर्वसन करण्यात येत आहेत. यावेळी वैद्यकीय अधीक्षक डॉ. संगीता गावित, मुख्य अधिसेविका प्रणिता गायकवाड उपस्थित होते. या केंद्राच्या प्रगतीसाठी सर्वतोपरी प्रयत्नशील असून कर्मचारी भरतीसाठी जिल्हाधिकारी यांच्याकडे चर्चा करण्यात येईल, अशी ग्वाहीसुध्दा डॉ. रामानंद यांनी दिली. याप्रसंगी बालरोग व चिकित्सा विभाग प्रमुख डॉ. बाळासाहेब सुरोशे, पोषण पुनर्वसन केंद्राचे डॉ. एस.जी. बडगुजर, डॉ. एस.एस. बन्सी, इन्चार्ज सिस्टर निर्मला सुरवाडे, संगीता सावळे, काळजीवाहक उमा सावकारे, नयना चावरे आदी उपस्थित होते.