लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : गेल्या काही दिवसांपासून जळगाव, एरंडोल, धरणगाव, यावल, चाळीसगाव आणि भडगाव या तालुक्यांमधून कृषी उत्पन्न बाजार समितीत फळे नेण्यास शेतकरी उत्सुक नसल्याचे दिसून येत आहे. त्यापेक्षा जास्त भाव थेट बाजारात विकल्यावर मिळत असल्याने शेतकरी थेट जळगाव शहर किंवा इतरत्र नेऊन आपला माल विकत आहेत.
जळगाव बाजार समितीत दररोज पहाटेच्या सुमारास शेतकरी आपला माल घेऊन येतात. बाजारात अडत्यांना माल विकल्यावर त्यातून मिळणाऱ्या नफ्यापेक्षा इतरत्र विक्री केल्यावर नफा जास्त मिळत असल्याने शेतकऱ्यांनी बाजारात माल विक्रीची पद्धत बदलल्याचे समोर येत आहे. ऐन उन्हाळ्यात टरबूज, खरबूज यांची विक्री जोरात होत आहे. बाजारात दहा रुपये किलो दराने टरबूज विकले जात आहे, तर बाजार समितीत माल नेल्यावर त्याला प्रतिक्विंटल ४०० ते ५०० रुपये भाव मिळतो. त्यामुळे तालुक्यातील शेतकरी आपला माल सरळ किरकोळ विक्रीसाठी आणत आहे.
निर्यातीतही वाढ
गेल्या काही दिवसांपासून जिल्ह्यातून टरबूज आणि खरबूज यांच्या निर्यातीत वाढ झाली आहे. मध्यपूर्वेतील देशांमध्ये जळगाव आणि परिसरातून खरबूज आणि टरबुजांची निर्यात केली जाते. त्यासाठी चांगल्या दर्जाच्या फळांना बाजारभावापेक्षाही जास्त भाव शेतकऱ्यांच्या बांधावरच मिळतो. त्यामुळे चोपडा, यावल या भागातून काही शेतकरी निर्यातक्षम टरबूज आणि खरबुजांची विक्री करत आहेत.
मंगळवारी बाजार समितीत आलेली फळे
फळे - वजन भाव
टरबूज १५ क्विंटल ५०० ते ६०० रुपये प्रतिक्विंटल
खरबूज - ३३ क्विंटल - ८०० रुपये प्रतिक्विंटल
पपई ३ क्विंटल १२००
द्राक्ष २१ क्विंटल २०००
लिंबू २५ क्विंटल २५०० ते ५०००