जळगाव : तालुक्यातील धामणगाव येथे शेतात फवारणी करत असताना हात न धुता, त्याच हातांनी पाणी पिल्यानंतर विषबाधा होऊन राजाराम ऊर्फ हिंमत सपकाळे (३९) या शेतकऱ्याचा मृत्यू झाल्याची घटना शनिवारी सकाळी ८ वाजेच्या सुमारास घडली. याप्रकरणी तालुका पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्याचे काम सुरू होते.
धामणगाव येथील राजाराम ऊर्फ हिंमत सपकाळे हे शनिवारी नेहमीप्रमाणे सकाळी शेतात गेले होते. या ठिकाणी शेतातील पिकांवर फवारणीचे काम करत होते. त्याचदरम्यान सपकाळे यांनी हात न धुता पाणी पिले. पाणी पिल्यानंतर चक्कर यायला लागल्याने सपकाळे एका ठिकाणी बसले. शेजारील एका शेतात त्यांचे भाऊ बापू सपकाळे काम करीत होते. त्यांच्या लक्षात हा प्रकार आला. त्यांनी राजाराम यांना तातडीने रुग्णालयात हलविले. मात्र जिल्हा रुग्णालयात पोहचण्यापूर्वीच राजाराम यांचा मृत्यू झाला होता. तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस हवालदार ईश्वर लोखंडे यांनी पंचनामा केला. शवविच्छेदनानंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला.