जळगाव : पावसाळा सुरू होऊन सध्या दीड महिन्यांचा कालावधी लोटला आहे. मात्र, अद्यापही शहराचे वैभव असलेल्या मेहरूण तलावात अद्याप पाच टक्केही पाणीसाठा जमा झालेला नाही. विशेष म्हणजे या तलावाचा मुख्य जलस्रोत असलेला अंबरझरा तलावाच अद्याप कोरडा ठाक असल्यामुळे, तो तलाव भरल्यानंतरच मेहरूण तलावात पाणी येणार आहे. अंबरझरा तलाव क्षेत्रात अद्यापही पुरेसा पाणीसाठा न झाल्यामुळे मेहरूण तलावात पाणी पोहोचले नसल्याचे मत पर्यावरणप्रेमींमधून व्यक्त होत आहे.
जळगाव शहराचे वैभव असलेल्या मेहरूण तलावाची मदार ही दरवर्षी मुख्य जलस्रोत असलेल्या अंबरझरा तलावावर असते, तर या अंबरझरा तलावात कुसुंबा व चिंचोली या परिसरातील डोंगर-दऱ्यातील पाणी येत असते. अंबरझरा तलाव जसजसा भरायला लागतो, तसतसे पाटचारीद्वारे पाणी मेहरूण तलावाकडे येत असते. मात्र, ७ जूनपासून पावसाळा सुरू झाल्यानंतर सध्या २२ जुलैपर्यंत तलावात ५ टक्केदेखील पाणीसाठा जमा झालेला नाही. पावसाळा सुरू होऊन दीड महिना उलटल्यानंतरही मेहरूण तलावाचे चारही बाजूंचे काठ हे कोरडेठाक आहेत. तलावात पाणी यायला लागल्यानंतर, सुरुवातीला तलावाच्या ज्या मधल्या भागात पाणी जमा व्हायला सुरुवात होते, त्या भागातही आतापर्यंत पाच फुटांपर्यंतच पाणी जमा झाले आहे. मात्र, गेल्या वर्षी पावसाळा सुरू झाल्यानंतर आषाढी एकादशीपर्यंत मेहरूण तलावात किमान २० टक्क्यांपर्यंत पाणीसाठा जमा झाला होता.
इन्फो :
...तर आता श्रावणातच तलाव भरण्याची शक्यता
यंदा सुरुवातीपासूनच जिल्ह्यात पावसाचे प्रमाण कमी असल्यामुळे अनेक शेतकरी बांधवांच्या पेरण्या लांबल्या. तसेच याचा परिणाम लहान-मोठे तलाव व जलाशयांवरही झाला आहे. ७ जूनपासून पावसाळा सुरू झाल्यानंतर, आतापर्यंत मधल्या काही दिवसांत अनेक ठिकाणी कमी प्रमाणातच पाऊस झाला आहे. त्यामुळे आता ९ ऑगस्टपासून सुरू होणाऱ्या श्रावण महिन्यात पावसाची कमतरता भरून निघण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. श्रावणातील संततधार `श्रावण झडी`मुुळे सर्वदूर पर्जन्यमान होेते. यामुळे नदी-नाले भरून वाहू लागतात आणि तलाव, जलाशयेही लवकर भरतात. त्याच प्रकारे जळगावकरांचे वैभव असलेला मेहरूण तलावही आता श्रावणातच १०० टक्के भरणार असल्याची शक्यता पर्यावरणप्रेमींमधून व्यक्त होत आहे.
इन्फो :
गेल्या वर्षी मेहरूण तलावात २० टक्क्यांपर्यंत पाणीसाठा जमा झाला होता. यंदा मात्र मेहरूण तलावाचा मुख्य जलस्रोत असलेल्या अंबरझरा तलावाच्या क्षेत्रातच पाऊस न झाल्यामुळे, मेहरूण तलावात पाणी आलेले नाही. मात्र, आता श्रावण महिन्यात पावसाचे प्रमाण जास्त राहत असल्याने, त्या कालावधीत हा तलाव १०० टक्के नक्की भरेल.
-विजय वाणी, पर्यावरणप्रेमी.
गेल्या काही वर्षांत मेहरूण तलाव परिसरात झालेल्या नागरी वस्तीमुळे, अनेक पाण्याचे स्रोत बंद झाले आहेत. त्यामुळे एकच अंबरझरा तलावाच्या स्रोतावर अवलंबून न राहता, मनपा प्रशासनाने पूर्वीचे बंद असलेले स्रोत पुन्हा सुरू केले पाहिजेत. ते पाणी तलावाकडे वळविले पाहिजे. तसेच श्रावणामध्ये पावसाचे प्रमाण जास्त राहत असल्यामुळे या दिवसात तलावाच्या पाणीसाठ्यात वाढ होण्याची शक्यता आहे.
- सुजाता देशपांडे, पर्यावरणप्रेमी.