१ जूनला मध्यरात्रीनंतर दीड-दोननंतर अचानक जोरदार पाऊस सुरू झाला. पाऊस पहाटे अडीच-पाऊणे तीनपर्यंत सुरू होता. वादळी वाऱ्यासह आलेल्या पावसाने क्षणात रौद्ररूप धारण केले. वादळाच्या तडाख्यात होत्याचे नव्हते झाले. यात शेकडो एकरातील कापणीस पक्व असलेली केळी भुईसपाट झाल्याने कोट्यवधींचे नुकसान झाले आहे. हातातील हंगाम गेल्याने शेतकरी हतबल झाला आहे. एकतर आजच येणारा पैसा हातातून गेला व दुसरीकडे नवीन हंगाम उभा करण्याचे संकट ठाकले आहे. त्यामुळे पुढील व्यवस्था कशी उभी करावी या विवंचनेत शेतकरी सापडला आहे.
आशा-आकांक्षावर फेरले पाणी
तालुक्यात केऱ्हाळे परिसर आतापर्यंत झालेल्या वादळाच्या तावडीतून सुटला होता. मात्र या वादळाने पुढील आशा-आकांक्षावर पाणी फेरले आहे. यामुळे उद्या हातात येणारा पैसा वाया गेल्याने भविष्य पुन्हा अंधारमय झाले आहे. अशा स्थितीत शासनाने व विमा कंपनीने शेतकऱ्यांना भरीव मदत केल्याशिवाय शेतकरी पुन्हा उभा राहणार नाही.
झाडे उन्मळून पडली
शेती शिवारसह गावातील मोठमोठी झाडं उन्मळून पडली, तर तर काही झाडं घराच्या अंगणात पडल्याने सुदैवाने जीवितहानी झाली नाही. रस्त्याने दुतर्फा असलेली झाडं पडल्यामुळे काहीकाळ रस्ता वाहतुकीस अडथळा निर्माण झाला. गावातील अनेक ठिकाणी घरावरील पत्रे लांब अंतरावर उडत गेली असून काही प्रमाणात घरांची पडझड झाली आहे यामुळे सर्व अस्वस्थ झाले आहे.
वीज कंपनीचे मोठे नुकसान
वादळामुळे झाडांच्या फांद्या विजेच्या तारेवर तथा खांबावर पडल्याने अनेक ठिकाणी तारा तुटून खांब पडले आहेत, तर काही ठिकाणी वाऱ्याच्या जोरामुळे विजेचे खांब जमीनदोस्त झाले आहेत. त्यामुळे गावातील वीजपुरवठा रात्रभरपासून खंडित झाला आहे. पावसाच्या पाण्याने शेतांमध्ये पाणी साचल्यामुळे अनेक ठिकाणी गट फुटले आहेत. यामुळे खुल्या शेतात पुढील हंगामासाठी टाकलेले शेणखतसुद्धा शेताबाहेर बाहेर वाहून गेले. यामुळे नुकसानीत भर पडली आहे.