लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : कृषी कायद्याविरोधात शेतकरी संघटनांनी शुक्रवारी पुकारलेल्या भारत बंदला पाठिंबा म्हणून जिल्हा काँग्रेसच्या वतीने काँग्रेसभवना समोर सकाळी ११ ते १ वाजेदरम्यान उपोषण केले. प्रमुख पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्त्यांनी यात सहभाग नोंदविला होता.
केंद्रातील भारतीय जनता पक्षाने लादलेल्या शेतकरी विरोधी तीन कृषी कायद्यांविरोधात तसेच महागाईच्या मुद्यांवर केंद्रातील मोदी सरकारला जागे करण्यासाठी शेतकरी संघटनांनी बंद पुकारला होता, अशी माहिती यावेळी देण्यात आली. जिल्हाध्यक्ष ॲड.संदीप पाटील, माजी खासदार डॉ. उल्हास पाटील, माजी जिल्हाध्यक्ष उदय पाटील यांच्या नेतृत्वाखाली हे उपोषण करण्यात आले. यावेळी शहर जिल्हा उपाध्यक्ष शाम तायडे, तालुकाध्यक्ष मनोज चौधरी, अनूसुचित जाती शहराध्यक्ष प्रदीप सोनवणे, जगदीश गाढे, सेवादल अध्यक्ष कैलास महाजन, छाया कोरडे, योगिता शुक्ल, अमजद पठाण, प्रमोद घुगे उपस्थित होते.
विविध पक्ष संघटनांचे पदाधिकारी यासह राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष ॲड रवींद्र पाटील, लाेकसंघर्ष मोर्चाच्या प्रतिभा शिंदे, वाल्मीक पाटील, मंगला पाटील, जमील शेख, फारूक शेख, भरत कर्डीले यांचीही उपस्थिती होती.