यावल : आदिवासी टोकरे कोळी समाजाला महाराष्ट्र शासनाच्या खावटी कर्ज योजनेच्या लाभापासून वंचित का ठेवले, याचा जाब विचारण्यासाठी यावल येथील आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयावर धरणे आंदोलन करून विविध मागण्यांचे निवेदन देण्यात आले.
येथील जिनिंग प्रेसच्या सभागृहात टोकरे कोळी जमातीची बैठक ॲड. गणेश सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली घेण्यात आली व यानंतर जिनिंग प्रेस सभागृहापासून प्रकल्प कार्यालयापर्यंत विविध मागण्यांच्या घोषणा देत प्रकल्प अधिकारी कार्यालयात धरणे आंदोलन केले गेले. यावेळी विविध मागण्यांचे निवेदन देण्यात आले.
महाराष्ट्र शासनाच्या आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयामार्फत खावटी कर्ज योजनेचा लाभ देण्यात आला असून आदिवासी टोकरे कोळी समाजातील लाभार्थांची प्रकरणे नाशिक येथील आयुक्त कार्यालयातील आलेल्या सूचनेनुसार प्रलंबित ठेवण्यात आली आहेत. तरी त्वरित त्या वंचित ठेवण्यात आलेल्या लाभार्थांना खावटी योजनेत दोन हजार रुपये व किराणा कीट वाटप करावे, या मुख्य मागणीसह, विविध अटी न लावता नव्याने वंचित लाभार्थांची नावे समाविष्ट करून सर्वांना लाभ मिळावा, यासह विविध मागण्यांचे निवेदन यावेळी देण्यात आले.
यावेळी वढोदा सरपंच संदीप सोनवणे, बामणोद सरपंच राहुल तायडे, प्रमोद कोळी (यावल), गोकुळ कोळी (मनवेल), पाडळसा सरपंच खेमचंद कोळी, समाधान मोरे, अरविंद सावळे, योगेश बाविस्कर, पिंप्री सरपंच मोहन कोळी, समाधान सोनवणे थोरगव्हाण, संदीप सोनवणे रिधुरी, भरत कोळी (यावल), कैलास सोळंखे (शिरागड), अनिल कोळी (साकळी), योगेश कोळी (अट्रावल), गजानन कोळी (पिंप्री) यांच्यासह तालुक्यातील समाजबांधव उपस्थित होते.