- कुंदन पाटील
अगदी धबधब्यासारखेच नीतळ, निर्मळ, निखळपणे शब्दांनी अनुभव बांधले. सुख-दु:खाच्या भावस्पर्शी अनुभवांची गाथा बांधत मनसोक्तपणे ‘रंग जीवनाचे’ उधळले. कुठेही आवर न घालता मनातले अनुभव बोल मनसोक्त मांडले. म्हणून ‘रंग जीवनाचे’ वेचायला प्रत्येक नजर आसुसली. ‘रंग जीवनाचे’ वेचल्यावर मनाला समाधानाची छटा आली आणि ‘बबन्या’ टू बबनरावांचा प्रवास मनाच्या कानाकोपऱ्यात भिडला. त्या उपजिल्हाधिकारी बबन काकडे यांच्या ‘रंग जीवनाचे’ या पुस्तकाविषयी...
चौथीतला बबन. शिक्षणासाठी पाथर्डीत भाड्याच्या खोलीत मुक्काम. माळेगावातल्या घरातून सायकलवर जेवणाचा डबा यायचा नी पोटपूजा व्हायची. या प्रवासात पाथर्डी बसस्थानकावरच्या एका हॉटेलमध्ये दोन रुपयात तांब्याभर रस्सा मिळायचा. तेव्हा कुठे बबनच्या सहकारी पार्टनरला समाधानाची ढेकर यायची. खर्च पेलवणारा नाही म्हणून १४० रुपयात घेतलेल्या सायकलच्या शीटवरुन माळेगाव-पाथर्डी प्रवास सुरु झाला. अगदी न थांबण्यासाठीच....
‘बुंदी नी जिलेबी’बाज बबन तसा लग्नघरी जातीने हात देणारा. लग्नाच्या पूर्वसंध्येला बुंदी पाडण्यासाठी धडाडीने हजर व्हायचे नी मदतकार्यात वाहून घ्यायचे. बुंदीचे चार दाणे तोंडात जातील म्हणून. ऐंशीच्या दशकात हा ‘बुंदी मेळा’ अनुभवायलाही नशीबच लागत होते. त्या आनंदातच नव्वदीच्या दशकापूर्वी बबनच्या हाती आयटीआयचे प्रमाणपत्र पडले.
औरंगाबादला एका खासगी कंपनीत नोकरी मिळाली. बालमनात लाल दिव्याखालचा अधिकारी बबनच्या नजरेत सामावला होताच. म्हणून स्पर्धा परीक्षेचे भूत डोक्यात होतेच. सोबतीला पाथर्डीतील फौजदार झालेल्या युवकाने चिंगारी पेटवली होती. मायबापही अपेक्षापूर्तीसाठी आतुर होते.कारण औरंगाबाद यायला बबनकडे पैशांची तरतूद नव्हती. बापमनातही बबनविषयी शंकाच होती. तेव्हा मायमन पाझरलं नी पायातले जोडवे मोडीत काढत आईने बबनला २५० रुपये दिले. हा क्षण बबनच्या मनातून पुसता येणारा नव्हताच. म्हणून बहिस्थ शिक्षणाची कास धरली आणि बबनचा बबनराव झाला तो कला शाखेची पदविका घेतल्यावर.
स्पर्धा परीक्षांचे दिव्य स्वप्न. या स्वप्नांआड बदलत्या शिफ्टची नोकरी आडवी यायची. कारण स्पर्धा परीक्षांच्या क्लासचा जुगाडही जमत नव्हता. तशातच दोन परीक्षांनी साझ नाकारलं. मग बबनरावांच्या डोक्यात नेट-सेटचे भूत घुसले. पण शिफ्टमधल्या नोकरीने सातत्याने पाय घातला. पण बबनराव हरले नाहीत. पुस्तकांच्या बाजारात चपला घासल्या. पुस्तकातल्या शब्द नी शब्द बबनरावांच्या डोक्यात बसला. १९९८ मध्ये ‘सेट’चा गड अखेर बबनरावांनी जिंकलाच.
नोकरीसाठी अर्ज पाठविण्याचा धडक कार्यक्रम बबनरावांनी हाती घेतला. पण नेम काही लागेना. तिकडे स्पर्धा परीक्षेचे भूतही अधूनमधून खाजवत होतं. म्हणून दगड मारण्याची सवय जडलीच होती. तिकडे बबनरावांची हळदही फिटली होती. सहजीवनाची लॉटरीही लागली होती. तशातच शेवटी एक दगड लागलाच. राज्यसेवेच्या पूर्व परीक्षेच्या उत्तीर्ण झालेल्या यादीत बबनराव बसले. माळेगावचा बबन नायब तहसीलदार बबन काकडे झाले.
बबनरावांचा प्रवास गंभीर आहे;मात्र त्यांनी तो मांडताना अतिशय सहजपणे आणि मनमोकळ्यापणानं मांडलाय. ग्रामीण जगण्यातला आनंदही तेवढाच दिमतीने मांडलायं. बबनरावांच्या शर्टात असणारा ‘हाडाचा शिक्षक’ही छान बोलता केलाय. कुठलाही बडेजावपणा नाही. पण विस्तवासारखे वास्तवही सहजपणे मांडले. कारण त्यांची वाटच बिकट होती. आईने पायातले जोडवे विकल्याचा अनुभव मांडताना मनातला हळवा कोपरा नक्कीच पाणावतो. त्याच उंचीचे चिमटेही बबनरावांनी घेतले आहेत. तेही स्वत:लाच. ३६ अनुभव वाचताना कधी बत्तीसी खळाळते तर कधी गुदगुदल्याही पडतात. कधी डोळेही पाणावतात. कधी बबनरावातला ‘बोंबिल’ माणूसही डोळ्यासमोर उभा राहतो. साऱ्या मांडणीत कमालीचा जिवंतपणा आहे. प्रत्येक अनुभव नजरेला शेवटच्या ओळीपर्यंत नेणारा आहे. त्यांचा नाजूकसा प्रवास आणि प्रयत्नांची शिकस्त यातील गोड-कटू अनुभवही तेवढेच वाखाखण्याजोगे आहेत. मार्गदर्शकही आहेत. ‘रंग जीवनाचे’ वेचताना नी वाचताना सारं लाईव्ह वाटतं. म्हणून तर ‘रंग जीवनाचे’ मनातील आनंदकण वेचून जातात.