लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : तालुक्यातील असोदा येथील ग्रामसेवक मेघश्याम तुळशीराम बागळ यांनी चौदाव्या वित्त आयोगात ३५ लाखांचा अपहार केल्याचा ठपका ठेवत मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. बी.एन. पाटील यांनी निलंबित करण्याचे आदेश गटविकास अधिकारी श्यामकांत सोनवणे यांना सोमवारी दिले. प्रथमदर्शनी गटविकास अधिकाऱ्यांच्या चौकशीत अपहार केल्याचे समोर आले असून अफरातफरीची चौकशी केल्यानंतर याबाबत गुन्हाही दाखल केला जाणार असल्याचे सांगण्यात आले.
महेंद्र नारखेडे यांनी याबाबत तक्रार दिली होती. शिवाय तातडीने संबंधित ग्रामसेवकावर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली होती. त्यानुसार गटविकास अधिकाऱ्यांमार्फत ग्रामसेवकांची चौकशी करण्यात आली. त्यानुसार चौदाव्या वित्त आयोगात ३५ लाखांचा अपहार झाल्याचे प्रदमदर्शनी समोर आले होते. दरम्यान, यानंतर सीईओंनी गटविकास अधिकाऱ्यांना सायंकाळी फोन करून संबंधित ग्रामसेवकाला निलंबित करण्याचे आदेश दिले.