या बसचालकाचे ऑपरेशन ‘विजय’मुळे बसमधील प्रवाशांसह सर्व थरांतून कौतुक होत आहे.
चाळीसगाव आगाराची बस (एमएच२४/बीटी२०७८) ही पारोळा येथून दुपारी सव्वाबारा वाजता चाळीसगावसाठी निघाली. साडेदहापासून बस नसल्याने या बसमध्ये ७०-८० प्रवाशांची गर्दी होती. शिंदी सोडल्यानंतर कोळगावदरम्यान येणाऱ्या एका नाल्यावर जोराचा आवाज होत प्रवाशांना धक्का बसला. बसच्या डाव्या बाजूचे सर्वच पाटे व पिन तुटली. बस एका बाजूने जमिनीवर टेकत जोराने हेलकावे खात रस्त्याच्या एका कडेला फरपटत जाऊ लागली. बसचालक विजय शर्मा यांनी गांभीर्य ओळखत व क्षणाचाही विलंब न लावता वेग नियंत्रणासाठी सुरुवातीला गिअर बदलविला. त्याच जोडीने नाल्यात जाण्यापासून बसला रोखले.
त्यादरम्यान स्टेअरिंग ताकदीने लावून धरीत बस घटनास्थळापासून दोनशे मीटरवर रस्त्याच्या कडेला रोखण्यात यश मिळवले. अन्यथा नाल्यात व खोलवर असलेल्या बाजूच्या शेतात वेगाने पलटी होत प्रवाशांच्या जीवावर बेतले असते. महिला वाहक संगीता पाटील यांनी प्रवाशांना धीर दिला. हा थरार अनुभवणाऱ्या प्रवाशांनी पटापट बसमधून उतरत चालकाला धन्यवाद दिले व आभार मानले. महिला प्रवाशांनी चालकाच्या रुपात देवच भेटला व काळ आला होता पण वेळ आली नाही, अशी भावना व्यक्त केली. तेथे जमलेल्या नागरिकांनी बसचालकाच्या हिमतीबद्दल पाठ थोपटली.