लोकमत न्यूज नेटवर्क
जालना : धर्माचा अधर्मावर, प्रकाशाचा अंधारावर आणि दहा प्रकारच्या असुरी प्रवृत्तींवर विजय म्हणजे श्रीकृष्ण जन्माष्टमी असून, श्रीकृष्ण भगवंताची सेवा हीच खरी परम सेवा आहे. तीच आपल्या उद्धाराचे साधन बनेल, असे प्रतिपादन रास गोविंद प्रभू यांनी कृष्ण जन्माष्टमी सोहळ्यात केले.
अंतरराष्ट्रीय कृष्ण भावनामृत संग ( इस्कॉन) तर्फे संपूर्ण जगात साजरी होत असलेली श्री कृष्ण जन्माष्टमी जालना शहरात तीन दिवस ऑनलाईन पद्धतीने उत्साह व भक्तिपूर्ण वातावरणात साजरी करण्यात आली. यात भागवत कथा, प्रवचन, श्लोक पठण, अभिषेक, महाआरती, भगवंताचे शृंगार, व्यंजनांचे भोग, या धार्मिक विधींसोबतच लहान मुले- मुलींसाठी चित्रकला, वेशभूषा, नाटिका, गायन स्पर्धा अशा भरगच्च कार्यक्रमांची रेलचेल होती.
रविवारी पहाटे पाच ते नऊपर्यंत भागवत कथा, शृंगार दर्शन, सायंकाळी चार ते सहा यावेळी श्रीमद् भागवतगीतेतील श्लोकांचे पठण करण्यात आले. सोमवारी सकाळी मंगल आरती, श्री कृष्णांवर आधारित कथा, भगवंताचे ऑनलाईन दर्शन, सायंकाळी एकशे आठ व्यंजनांचे भोग असलेले नैवेद्य अर्पण करून भजन, कीर्तन, रात्री बारा वाजता श्री कृष्ण जन्मोत्सवाची महाआरती करण्यात आली. रास गोविंद प्रभू यांनी प्रवचनात श्री कृष्ण भक्तीचे महत्त्व सांगून कृष्ण सेवेतच मानवाचा उद्धार असल्याचे निरूपण केले. मंगळवारी प्रभूपाद यांची गुरूपूजा, सायंकाळी नंदोत्सव व प्रभूपाद आविर्भाव महोत्सवात भाविकांनी प्रभूपादांच्या मार्गदर्शनामुळे जीवनात झालेल्या आमूलाग्र बदलांचे अनुभव कथन केले. महाप्रसादाने उत्सवाची सांगता झाली. यशस्वीतेसाठी गोविंद दत्त दास, अनया अग्रवाल, मुकेश अग्रवाल, किशोर तिवारी, ज्योती गोरंट्याल, मंगल मुंदडा, आदींनी परिश्रम घेतले.