कपाशीवरील रोगामुळे शेतकऱ्यांचे नुकसान
भोकरदन : तालुक्यातील हसनाबाद व परिसरातील कपाशीवर रोगाचा प्रादुर्भाव झाला आहे. या रोगामुळे कपाशीचे पीक पिवळे पडू लागले असून, औषध फवारणीनंतरही पिकांवरील रोगाचा प्रादुर्भाव कायम आहे. त्यामुळे लागवडीवर केलेला खर्चही निघणार की नाही ? असा प्रश्न शेतकऱ्यांना पडला आहे. याकडे कृषी विभागाने लक्ष देऊन मार्गदर्शन करावे, अशी मागणी होत आहे.
थकीत मानधन देण्याची मागणी
परतूर : जिल्ह्यातील कंत्राटी निवडणूक संगणक चालकांचे गत पाच महिन्यांपासून मानधन थकीत आहे. हे थकीत मानधन द्यावे, मानधनात वाढ करावी, अशी मागणी संगणक चालकांच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांकडे करण्यात आली. यावेळी बाळू शिंगनारे, अमोल गिरी, विठ्ठल कथले, गौतम गवई, कृष्णा तळेकर, रूपेश हुंडीवाले, एकनाथ चव्हाण, बाळासाहेब खरवणे, कैलाश पिठोरे, प्रमोद कांबळे, प्रवीण सोनवणे, रूचा कुलकर्णी व इतर संगणक चालकांची उपस्थिती होती.