जालना : गत काही वर्षांत शहरात नवीन वसाहतींची भर पडली आहे. मालमत्ता ८० हजारांवर गेल्या आहेत. एवढ्या मालमत्ताधारकांना पालिका मूलभूत सुविधा देण्यास असमर्थ ठरत आहे. तत्कालीन मालमत्ता सर्व्हेक्षण एजन्सीने तीन वर्षांत कोट्यवधींचा चुना लावला आहे. एकूणच नवीन व जुन्या सर्व्हेक्षण एजन्सींचा घोळ कायम आहे. पालिकेच्या म्हणण्यानुसार शहरात ८० हजारांवर मालमत्ता असाव्यात. गत तीन वर्षांपूर्वी नागपूर येथील डबरासी या एजन्सीला सर्व्हेक्षणाचे काम देण्यात आले होते. या एजन्सीने मालमत्तांचे सर्व्हेक्षण बोगस केल्याचा आरोप आहे. यातच संबंधित एजन्सीच्या कर्मचाऱ्यांनी मालमत्तांच्या आखीव पत्रिकेत बदल करून परस्पर लाखो रूपये उचलून पालिकेचे अंदाजे २४ कोटी रूपयांचे नुकसान केले. यामुळे मालमत्ताधारकांकडून मिळणार करही पालिकेला मिळाला नाही. मिळाला तरी अल्प प्रमाणात. या कामांत पालिकेच्या काही कर्मचाऱ्यांचेही हात ओले झाल्याचे चर्चा आहे. डबरासी चुना लावत असल्याची पालिकेला उपरती झाल्यावर पालिकेने संबंधित एजन्सीचे काम थांबविले. काही दिवसांपूर्वी कोलब्रो या एजन्सीला पुन्हा नव्याने सर्व्हेक्षणाचे काम देण्यात आले असून, ही एजन्सी अत्याधुनिक उपकरणांद्वारे सर्व्हेक्षण करणार असल्याचे मुख्याधिकारी यांनी सांगितले. जुन्या एजन्सीने केलेला सर्व्हे, मोजलेल्या मालमत्ता व आता नवीन एजन्सीचे सर्व्हेक्षण यात मोठे गौडबंगाल आहे. डबरासीने तीन वर्षांत केलेल्या सर्व्हेक्षणाच्या नोंदी कोठे आहेत हा प्रश्न उपस्थित होतो.
मालमत्ता सर्व्हेक्षणाचा घोळ कायम...!
By admin | Updated: June 23, 2016 01:06 IST