चंदनझिरा : जालना शहरातील चंदनझिरा टी पॉईंट ते हनुमान मंदिर या मुख्य रस्त्याची चाळणी झाल्याने वाहनधारकांना कसरत करीत वाहने चालवावी लागत आहे. याकडे नगरपालिकेने लक्ष द्यावे, अशी मागणी होत आहे.
जालना -औरंगाबाद महामार्गावर असलेल्या चंदनझिरा परिसरात दिवसेंदिवस विस्तार वाढत चालला आहे. परंतु, येथील नागरिकांना म्हणाव्या तशा सोयी सुविधा मिळत नाही. येथील मुख्य रस्त्याची दुरवस्था झाली आहे. सध्या पावसाळ्याचे दिवस असल्याने सर्वत्र चिखल झाला आहे. वाहनधारकांसह विद्यार्थ्यांना रस्त्यावरील चिखलाचा तुडवत जावे लागत आहे. गेल्या आठ दिवसांपासून या भागात मुसळधार पाऊस पडत आहे. त्यामुळे जागोजागी खड्डे पडले आहेत. काही भागातील नाल्या जाम झाल्याने पाणी रस्त्यावरून वाहत आहे. नगरपालिकेच्या वतीने नालेसफाई करण्यात यावी.
शिवाय, उन्हाळ्यात रस्त्यावरील धूळ दुकानात जात आहे. व्यापारी त्रस्त झाले आहे. धुळीमुळे दुकानातील सामान खराब होत आहे. काही व्यापाऱ्यांनी धुळीपासून बचाव करण्यासाठी शटरसमोर पण्णी लावली आहे. हा रस्त्याचे तातडीने काम करावे, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.