भोकरदन तालुक्यातील वालसावंगी परिसरात मोठ्या प्रमाणात मिरचीची लागवड केली जाते. यंदाही बहुतांश शेतकऱ्यांनी मिरचीची लागवड केली आहे; परंतु मिरचीला भाव मिळत नसल्याने शेतकरी हैराण झाला आहे. गेल्या आठवडाभरापासून पिंपळगाव रेणुकाई येथील बाजारपेठेत मिरचीला ४ ते १२ रुपये किलोपर्यंत जेमतेम भाव मिळत आहे. मिरची तोडणीसाठी ६ रुपये किलोप्रमाणे मजुरी दिली जाते. त्यामुळे शेतकऱ्यांना मोठे नुकसान सहन करावे लागत आहे. परिणामी, शेतकऱ्यांनी आता हिरव्या मिरचीची तोडणी बंद केली आहे. शेतकरी झाडालाच मिरची लाल होऊ देत आहेत. लाल मिरचीला बाजारात चांगला भावही मिळत असल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले.
दुसरीकडे मिरचीला भाव नसल्याने वालसावंगीसह पारध, पिंपळगाव रेणुकाई, आन्वा, जळगाव सपकाळ, धावडा, वाढोणा, लिहा, शेलूद, पोखरी आदी भागांतील शेतकरी मिरचीवर नांगर फिरवत असल्याचे चित्र आहे.
मिरचीला पिंपळगाव रेणुकाई येथील बाजारात ४ ते १२ रुपये किलोंचा कवडीमोल भाव मिळत आहे. यामुळे मजुरीवर झालेला खर्च निघत नाही. त्यामुळे शेतकरी लाल मिरचीकडे वळाला आहे. लाल मिरचीला बाजारपेठेत भावही चांगला आहे.
- कौतिक गवळी, वालसावंगी
म्हणून कवडीमोल भाव
गेल्या वर्षभरापासून राज्यात कोरोनाचे संकट असल्यामुळे बांगलादेशासह आदी भागांत मिरचीची वाहतूक ठप्प झाली आहे. माल परदेशासह राज्यात जाणे बंद झाले आहे. त्यामुळे मिरचीला कवडीमोल भाव मिळत असल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले.