जामखेड : कोरोनामुळे जामखेड परिसरातील बंद करण्यात आलेले जनावरांचे आठवडी बाजार अद्यापही बंदच आहेत. बाजार बंद असल्याने व्यापाऱ्यांकडून जनावरांना कवडीमोल दर दिला जात आहे.
मागील एक वर्षापूर्वी जनावरांचा आठवडी बाजार भरायचा. बाजारात शेतकरी गाई, म्हशी, शेळी, बोकड ही जनावरे विक्रीसाठी आणायचे. जनावरांच्या खरेदी - विक्रीतून आर्थिक अडचणी दूर व्हायच्या. अंबड येथील गुरुवारचा, सुखापुरी येथील शनिवारचा, वडीगोद्रीतील शुक्रवारचा, पैठण तालुक्यातील पाचोड येथील रविवारचा, तसेच आडूळ येथील मंगळवारी भरणारा जनावरांचा आठवडा बाजार सर्वदूर प्रसिद्ध आहे. त्यामुळे खरेदी-विक्री मोठ्या प्रमाणावर होत असते. व्यापारी त्यांच्याकडून विविध जातीच्या गाई, बैल, शेळ्या, बोकड आणतात. परिसरातील शेतकरी गाई, बैल, म्हैस, शेळ्या, बोकड विक्री करून घरखर्च किंवा शेतीकामे खर्च भागवितात. काही व्यापारी देखील या मालाला उठाव देतात. त्यामुळे ही उलाढाल चांगलीच होत असते. परंतु, कोरोनामुळे वरील ठिकाणचे आठवडी बाजार बंद आहेत. आता तर चक्क शेळी, बोकड याचे फोटो काढून व्हाॅट्स ॲपवर पाठवून त्यांच्या विक्रीचे प्रयत्न केले जात आहेत. कोणाला आवडले तर तो व्यापारी, शेतकरी येतात, पाहणी करतात आणि खरेदी करून नेतात. परंतु, शेतकऱ्यांना बाजारभाव हवा तसा मिळत नाही. ठराविकच व्यापारी येत असल्याने कवडीमोल भावात जनावरांची विक्री केली जात आहे. यात शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत आहे. ही बाब पाहता, बंद असलेले जनावरांचे आठवडी बाजार पुन्हा सुरू करावेत, शेतकऱ्यांचे होणारे नुकसान टाळण्यासाठी प्रशासनाने पुढाकार घ्यावा, अशी मागणी शेतकरी अमोल डोईफोडे, चंद्रहास तार्डे, रशीद कुरेशी, रामेश्वर पवार, गोरख डोईफोडे, गोरख जाधव आदींनी केली आहे.