मोकाट कुत्र्यांमुळे वाहनधारक त्रस्त
टेंभुर्णी : जाफराबाद तालुक्यातील टेंभुर्णी येथे मोकाट कुत्र्यांच्या संख्येत भरमसाठ वाढ झाल्याने वाहनधारकांना त्रास सहन करावा लागत आहे. टेंभुर्णीचा मुख्य रस्त्यावर नेहमीच मोकाट कुत्र्यांची वर्दळ असते. रस्त्याच्या मधोमध टोळके फिरत असल्याने वाहनचालकांना रस्त्यावरून चालताना कसरत करावी लागते. अनेक दुचाकीस्वार मध्ये कुत्रे आडवे आल्याने जखमी झाल्याच्या घटना घडत आहे.
उटवद परिसरात अद्रक पाण्यात
जालना : जालना तालुक्यातील विरेगाव महसूल मंडळातील उटवद सह परिसरात मुसळधार पाऊस पडल्याने परिसरातील आद्रक पिकात पाणी साचले आहे. या पिकाचा महसूल विभागाने पंचनामा करुन तातडीने नुकसान भरपाई देण्यात यावी, अशी मागणी शेतकरी राजू जाधव यांनी महसूल विभागाकडे केली आहे.
शहरात रिपब्लिकन सेनेची बैठक
जालना : रिपब्लिकन सेनेच्या वतीने शनिवारी अंबड चौफुली येथील शासकीय विश्रामगृह येथे बैठक आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीस पश्चिम जिल्हाध्यक्ष लिंबाजी वाहुळकर, पूर्व जिल्हाध्यक्ष दिनेश आदमाने, जिल्हा संपर्कप्रमुख अण्णासाहेब जितेकर, जिल्हा महासचिव एक्स आर्मी चंद्रकांत खरात, जिल्हा संघटक मच्छिंद्र खरात आदींची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. या बैठकीस जिल्ह्यातील रिपब्लिकन सेनेचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन जालना पश्चिम जिल्हाध्यक्ष लिंबाजी वाहूळकर यांनी केले आहे.
धावड्यात पोळा सण शांततेत साजरा
धावडा : शेती यंत्राने करण्यावर शेतकऱ्याचा भर असून बैलजोडीचे प्रमाण काही प्रमाणात कमी झाले आहे. दरम्यान, पिकांतील आंतर मशागतीची कामे ही बैलजोडीने होत असल्याने तुरळक का होईना मात्र, गुणवंत अशी बैलजोडी शेतकऱ्यांनी जपून ठेवली आहे. या बैलजोडीचा सण पोळा नुकताच साजरा झाला असून, दरवर्षीच्या तुलनेत यंदा बैलजोडीची संख्या वेशीत अल्प प्रमाणात पहायला मिळाली. धावडा येथे मोठ्या गाजावाजा करून साजरा केल्या जाणाऱ्या पोळा सणात यंदा बैलजोडीची संख्या कमीच पहायला मिळाली.
मूर्ती वेस उतरवून घेण्याची मागणी
जालना : जालना शहरातील पाणी वेस, राजमहल टॉकीज, दर्गा वेस, चमडा बाजार, रामनगर, गांधीनगर यासह शहरातील विविध भागात असलेल्या वेस पुरातत्त्व विभागाकडे अर्ज करून सन्मानपूर्वक उतरवून घ्याव्यात, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे शहर उपाध्यक्ष ज्ञानेश्वर धानुरे यांनी केली. मंगळ बाजार जवळील वेशीतून सध्या रस्ता बंद केला आहे.
रामनगर परिसरात पिके भुईसपाट
जालना : तालुक्यातील रामनगर परिसरात सर्वत्र झालेल्या अतिवृष्टीमुळे पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. अनेक शेतातून पाणी गेल्याने कपाशी, सोयाबीन, बाजरी पूर्णपणे भुईसपाट झाली. मोसंबी, डाळिंब तसेच कळीच्या फळबागांचे ही नुकसान झाले.