काठमांडू : पश्चिम नेपाळमध्ये मोठी दरड कोसळून भारत व नेपाळमधून वाहणाऱ्या एका प्रमुख नदीचा प्रवाह अडला असून, पुराची भीती निर्माण झाल्याने या भागातील हजारो नागरिक पलायन करत आहेत. या भागात अचानक पूर येण्याची भीती आहे. काठमांडूपासून १४० कि.मी. वायव्येला असणाऱ्या मायाग्दी जिल्ह्यातील काली गंडकी नदीत दरड कोसळून रात्रीत मोठा खोल व सतत वाढणारा नवा जलाशय निर्माण झाला आहे. नदीचा प्रवाह अडल्यामुळे तयार झालेल्या या जलाशयाची पातळी १५० मीटरपर्यंत वाढल्याचे नेपाळ पोलिसांनी टिष्ट्वटरवर म्हटल आहे. या भागात सैनिक तैनात करण्यात आले असून, आतापर्यंत जीवितहानी झालेली नाही. नदीच्या पात्रात सातत्याने दरडी कोसळत असून, विज्ञान व तंत्रज्ञान मंत्रालयाने या नदीच्या दोन्ही भागांत हाय अलर्टचा इशारा दिला. कालीगंडकी नदीच्या पात्रात प्रवाहाच्या वरच्या बाजुला बेनीबझारपासून १० कि.मी. अंतरावर कृत्रिम तलाव निर्माण झाला असून, बेनीबझार व गालेश्वर बझार दोन्ही गावांतील लोकांना हाय अलर्टचा इशारा देण्यात येत आहे, असे या मंत्रालयाच्या वेबसाईटवर म्हटले आहे. भूकंपामुळे दरडी कोसळतात सर्वसाधारणपणे पावसाळ्यात पावसामुळे दरडी कोसळतात; पण आता भूकंपामुळे जमिनीला तडे गेले व ढिगारे तयार झाले आहेत ,त्यामुळे दरडी कोसळत आहेत असे तज्ज्ञांनी म्हटले आहे. दगड, माती व चिखल यांचे ढिगारे कोसळत असून, मोठा आवाज होत असल्याचे इ कांतीपूरने म्हटले आहे. नवालपारासीचे जिल्हाधिकारी हरिप्रसाद मैनाली यांनी सांगितले की कृत्रिम जलाशय फुटू नये म्हणून गंडक कालव्याचे सर्व ३६ दरवाजे उघडण्यात आले आहेत. गृहमंत्री बामदेव गौतम व संरक्षण मंत्रालयातील अधिकाऱ्यांनी नागरिकांच्या सुरक्षेकडे लक्ष द्यावे असे पंतप्रधान सुशीलकुमार कोईराला यांनी सांगितले आहे. २५ एप्रिलच्या ७.८ तीव्रतेच्या भूकंपानंतर नेपाळमध्ये दरडी कोसळण्याच्या अनेक घटना घडल्या आहेत. (वृत्तसंस्था)
नेपाळला पुराचा धोका
By admin | Updated: May 25, 2015 00:51 IST