यंदा लिलावाच्या पहिल्या फेरीत सात घाट लिलावात गेले होते. यात वसमत तालुक्यातील परळी दशरथे, माटेगाव, औंढा तालुक्यातील माथा, आजरसोंडा, ब्राह्मणगाव, कळमनुरी तालुक्यातील सापळी, कसबे धावंडा या घाटांचा समावेश होता. यातून प्रशासनाला जवळपास ५.६९ कोटींचा महसूल मिळाला होता. दुसऱ्या फेरीत पुन्हा ९ घाट लिलावात गेले आहेत. यात औंढा तालुक्यातील अनखळी ३३ लाख, भगवा ३१ लाख, नांदखेडा ५१ लाख, कळमनुरी तालुक्यातील चिखली ३३ लाख, डोंगरगाव पूल ३६ लाख, कोंढूर ३४ लाख, सावंगी भुतनर २९ लाख, सोडेगाव ३० लाख तर वसमत तालुक्यातील सावंगी बुद्रूकचा घाट ४१ लाखांना गेला आहे. यातून जिल्हा प्रशासनाला ३.२१ कोटींचा महसूल मिळणार आहे.
हिंगोली जिल्ह्यात मागील तीन ते चार वर्षांत प्रथमच वाळू घाट लिलावातून जिल्हा प्रशासनाला चांगला महसूल प्राप्त झाला आहे. शिवाय यामुळे आता अवैध वाळू उपसा थांबण्यास मदत होणार आहे. लिलावातून घाट विकत घेणारेच आता अवैध वाळू उपसा करणाऱ्यांवर नजर ठेवून राहतील, असे दिसत आहे. त्यामुळे प्रशासनाचा दुहेरी फायदा होणार आहे. शिवाय यामुळे रखडलेल्या कामांनाही पुन्हा गती येणार आहे.