हिंगोली : कोरोनामुळे बंद करण्यात आलेल्या बहुतांश रेल्वेगाड्या अद्यापही बंदच आहेत. सध्या सहा स्पेशल गाड्या सुरू असल्या तरी प्रवासी मार्गावरील रेल्वे अद्याप बंदच आहेत. त्यात अकोला- पूर्णा मार्गावर एकही पॅसेंजर रेल्वे गाडी सुरू नसल्याने प्रवाशांना गैरसोयीला सामोरे जावे लागत आहे.
कोरोनाने दीड वर्षापासून देशभरात चांगलाच धुमाकूळ घातला आहे. त्यामुळे केंद्र, राज्य शासनासह स्थानिक प्रशासनही प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यासाठी प्रयत्नशील आहेत. याचाच भाग म्हणून मागील काही महिन्यांपासून रेल्वेगाड्याही बंद करण्यात आल्या आहेत. मध्यंतरी कोरोनाचा संसर्ग थोडा कमी झाल्याने काही मार्गावर स्पेशल गाड्या सुरू करण्यात आल्या आहेत. हिंगोली येथून अकोला ते पूर्णा मार्गावर पूर्वी १६ रेल्वेगाड्या धावत होत्या. मात्र, कोरोनामुळे सध्या सहा स्पेशल रेल्वेगाड्या धावत आहेत. त्यात रिझर्वेशन केले तरच या गाड्यातून प्रवास करता येत आहे. या मार्गावरून नागपूर, कोल्हापूर, मुंबई, दिल्ली, अमृतसर, हैदराबाद, सिकंदराबाद मार्गावर जाणारे मोठ्या प्रमाणात प्रवासी आहेत. मात्र, लांब पल्ल्याच्या बहुतांश गाड्या बंद असल्याने प्रवाशांना एसटी बस किंवा खासगी वाहनाने प्रवास करावा लागत आहे.
सध्या सुरू असलेल्या रेल्वे
अमरावती - तिरुपती-अमरावती
नरखेड- काचिगुडा- नरखेड
श्री गंगानगर - हु. सा. नांदेड- श्री गंगानगर
जयपूर - सिकंदराबाद-जयपूर
जयपूर -हैदराबाद- जयपूर
जम्मू तावी- हु. सा. नांदेड- जम्मू तावी
या गाड्या कधी सुरू होणार
अकोला -पूर्णा -अकोला
इंदौर -यशवंतपूर - इंदौर
अकोला -परळी -अकोला
अजमेर -हैदराबाद - अजमेर
अमृतसर -हु. सा. नांदेड - अमृतसर
उना हिमाचल -हु. सा. नांदेड -उना हिमाचल
नागपूर -कोल्हापूर - नागपूर
अमरावती -पूणे - अमरावती
बिकानेर -हु. सा. नांदेड-बिकानेर
अजनी -मुंबई-अजनी
पॅसेंजर गाड्याचे घोडे कोठे अडले ?
अकोला-पूर्णा मार्गावरून सध्या सहा स्पेशल गाड्या सुरू करण्यात असल्या तरी या मार्गावरून एकही पॅसेंजर रेल्वे धावत नाही. यामुळे लहान स्थानकावर उतरणाऱ्या प्रवाशांना रेल्वे प्रवासापासून मुकावे लागत आहे. या रेल्वे सध्या तरी सुरू करण्याचे कोणतेही नियोजन नसल्याचे दिसत आहे. याबाबत येथील स्टेशन मास्तरांना विचारणा केली असता वरिष्ठ स्तरावरून कोणत्याही सूचना मिळाल्या नसल्याचे त्यांनी सांगितले, तसेच पॅसेंजर गाड्या कधी सुरू होणार याबाबतही रेल्वेचा कोणताही अधिकारी बोलण्यास तयार नाही.
कोरोनाचा संसर्ग कमी झाल्याने बससेवा पुन्हा सुरू झाली आहे. मात्र, अद्याप मुंबई, पुणे, नागपूर येथे जाणाऱ्या रेल्वे सुरू झाल्या नाहीत. त्यामुळे खासगी वाहनाचा वापर करावा लागत आहे. रेल्वेगाड्या लवकर सुरू कराव्यात.
- राजेंद्रप्रसाद जाधव, आखाडा बाळापूर.
हिंगोली जिल्ह्याचे मुख्यालय आहे. शासकीय कामासाठी नियमित हिंगोलीला यावे लागते. अकोला-पूर्णा मार्गावरून सहा गाड्या सुरू असल्या तरी एकही पॅसेंजर गाडी धावत नाही. पॅसेंजर गाड्या नसल्याने जादा पैसे देऊन खासगी वाहनाने प्रवास करावा लागत आहे.
- संजय भगत, राजदरी.
फोटो : १३