लोकमत न्यूज नेटवर्क
हिंगोली : हिंगोलीत राज्य राखीव दलाच्या जवानाने गफळास घेऊन आत्महत्या केल्याची घडना २९ डिसेंबर राेजी सकाळी उघडकीस आली आहे. हिंगोलीत एसआरपीमध्ये असलेले जवान सुनील भीमराव जाधव (३५, बक्कल न. १०५४, रा. कोल्हापूर) हे त्यांची पत्नी व लहान मुलासोबत राज्य राखीव दलाच्या वसाहतीमध्ये राहतात. २९ डिसेंबर राेजी पहाटे त्यांच्या पत्नीला जाग आल्यानंतर त्यांना सुनील यांचा मृतदेह हॉलमधील पंख्याला गळफास घेतलेल्या स्थितीत आढळून आला.
या प्रकाराची माहिती राज्य राखीव दलाच्या अधिकाऱ्यांना मिळाल्यानंतर त्यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. या घटनेची माहिती हिंगोली शहर पोलीस ठाण्यालाही देण्यात आली आहे. दरम्यान, मयत जवान सुनील जाधव हे मूळचे कोल्हापूर येथील रहिवासी आहेत. हिंगोलीच्या राज्य राखीव दलाच्या भरतीमध्ये सन २००६ मध्ये ते भरती झाले होते. आतापर्यंत त्यांनी नक्षलग्रस्त भागात तसेच देशातील विविध राज्यांतील निवडणुकांमध्ये बंदोबस्त केला आहे. राखीव दलातील मनमिळावू जवान म्हणून त्यांची ओळख होती. त्यांच्या आत्महत्येच्या घटनेने राखीव दलात खळबळ उडाली आहे. मात्र, त्यांच्या आत्महत्येचे नेमके कारण समजू शकले नाही.