रामलीला मैदानाला चारही बाजूने रस्ता झाला आहे. या रस्त्यांवरही मोठ्या प्रमाणात अतिक्रमणे झाली होती. यावर बुलडोजर चालविण्यात आला आहे. हिंगोली शहरातील इतर भागांतील अतिक्रमणधारकांत यामुळे धास्ती पसरली आहे. जवाहर रोड, पोस्ट ऑफिस रोडवर थाटण्यात आलेल्या टपऱ्या आज गायब झाल्याचे पाहायला मिळाले. इतरही काही रस्त्यांवरील टपरीधारकांनी आपले सामान गुंडाळून घरी नेणे पसंत केले. यावेळी पालिकेकडून साहित्याची नासधूस केली जात असल्याने आता अतिक्रमणधारकांमध्ये धास्ती पसरली आहे.
याबाबत विचारले असता, मुख्याधिकारी डॉ.अजय कुरवाडे म्हणाले, अतिक्रमणधारकांविरुद्धची ही मोहीम सुरूच राहणार आहे, शिवाय आणखी काही नवीन रस्त्यांची कामे हाती घेतली जाणार आहेत. यात विकास आराखड्यानुसार काही बांधकामांना धक्का बसणार आहे. लवकरच ही कारवाई करून ही कामेही हाती घेतली जाणार आहेत.