लोकमत न्यूज नेटवर्क
हिंगोली : जिल्ह्यात कोरोना आजाराचे रुग्ण वाढू लागल्याने जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांनी दिनांक १ ते ७ मार्चदरम्यान टाळेबंदी जाहीर केल्यामुळे तिन्ही आगारातील बसेसची चाके थांबली आहेत. अन्य जिल्ह्यातील बसेस आगारात येत असल्या तरी आगारातील बसेस पुढील आदेश येईपर्यंत आगारातच राहणार असल्याचे महामंडळाकडून सांगण्यात आले.
जिल्ह्यात कोरोनाच्या रुग्णसंख्येत वाढ होत आहे. पंधरा दिवसांपासून कोरोना रुग्णांचा आकडा दोन अंकी झाला आहे. कोरोनाचे वाढते रुग्ण लक्षात घेऊन एस. टी. महामंडळाला बसेस बाहेर न सोडण्याचे आदेश जिल्हा प्रशासनाने दिले आहेत. जिल्हा प्रशासनाने १ मार्च रोजी टाळेबंदी जाहीर केली. तेव्हापासून बसस्थानकात प्रवाशांची अँटिजेन चाचणी करण्यात येत आहे. बाहेरगावाहून आलेल्या प्रवाशांची तपासणी करुनच त्यांना सोडण्यात येत आहे. पहिले दोन दिवस बसस्थानकाचे मुख्य प्रवेशद्वार खुले होते. परंतु, बाहेरगावाहून आलेले काही प्रवासी अँटिजेन चाचणी न करता जात होते. हे पाहून महामंडळाने मुख्य प्रवेशद्वार बंद केले आहे. औंढा रस्त्यावरील प्रवेशद्वार बाहेरगावच्या बसेसला ये-जा करण्यासाठी खुले ठेवण्यात आले आहे.
चालक-वाहकांनी करावी प्रवाशांची देखभाल
हिंगोली, वसमत आणि कळमनुरी आगारातील बसेस आगारातून सोडण्यात येत नसल्यामुळे चालक-वाहकांना कामे नाहीत. चालक-वाहकांनी रोजच्या वेळेत आगारात येऊन वरिष्ठांनी दिलेल्या आदेशाचे पालन करत महामंडळातील अंतर्गत कामे करावीत. अन्य जिल्ह्यातील बसेसमधून उतरलेला प्रवासी तपासणी न करता बसस्थानकातून बाहेर जाता कामा नये, बाहेर जातेवेळेस प्रवाशांना मास्क घालण्याची सूचना करावी, अशा सूचना चालक-वाहकांना दिल्याचे स्थानकप्रमुख संजीवकुमार पुंडगे यांनी सांगितले.