१२ व १३ मार्च रोजी शहरातील १४२ व्यापाऱ्यांची आरटीपीसीआर चाचणीसाठी त्यांचे स्वॅब घेऊन ते तपासणीसाठी हिंगोलीच्या प्रयोगशाळेत पाठविण्यात आले होते. पाठविण्यात आलेल्या अहवालांपैकी ६८ अहवाल प्राप्त झाले असून, त्यात ३ व्यापारी पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्ह्यातील सर्व आस्थापना मालक, दुकानदार, अधिनस्त कर्मचारी, फेरीवाले, किरकोळ विक्रेते यांना दुकान उघडण्यासाठी कोरोनाच्या अनुषंगाने आरटीपीसीआर चाचणी करणे बंधनकारक केले आहे. त्यामुळे दुकानदारांसाठी कोरोना चाचणीचा कॅम्प आयोजित केला होता. १२ व १३ मार्च रोजी १४२ व्यापाऱ्यांची आरटीपीसीआर चाचणी करण्यात आली. पैकी ६८ जणांचा अहवाल आला असून, ७४ अहवाल येणे बाकी आहे. १५ मार्च रोजी ३७ दुकानदारांची आरटीपीसीआर चाचणी करण्यात आली. आरटीपीसीआर चाचणीसाठी उपजिल्हा रुग्णालयाच्या प्रांगणात उपजिल्हा रुग्णालय व नगर परिषद विभागाच्यावतीने कॅम्पचे आयोजन करण्यात आले.
चाचणी मोहीम यशस्वीतेसाठी डॉ. आनंद मेने व मुख्याधिकारी उमेश कोठीकर यांच्या नेतृत्वाखाली डॉ. अश्विनी राऊत, डॉ. शारदा राऊत, डॉ. रवी टाले, डॉ. प्राजक्ता कुहीरे, डॉ. शिवाजी विसलकर, डॉ. सुषमा टाक, सुनीता विणकरे, कल्पना पंधरे, विलास बुद्रुक, अजय ठाकूर, कैलास ताटे, हुकुम सिंग, म. जाकेर, मनोज नकवाल, रोहित जुने, वाढवे आदी विशेष परिश्रम घेत आहेत.