हिंगोली : स्पर्धा परीक्षा देऊन अधिकारी होण्याचे स्वप्न पाहणाऱ्या विद्यार्थ्यांच्या पदरी निराशाच पडत आहे. कोरोनामुळे चार वेळेस पुढे ढकलावी लागलेली एमपीएससीची परीक्षा आता २१ मार्च रोजी होणार आहे. मात्र यावेळी रेल्वे व एमपीएससीची परीक्षा एकाच दिवशी होणार असल्याने दोन्ही परीक्षेचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांना एका परीक्षेला मुकावे लागणार आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांतून संताप व्यक्त केला जात आहे.
अधिकारी होण्याचे स्वप्न पाहणारे विद्यार्थी पाच वर्षांपासून स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करीत आहेत. शासकीय नोकरी मिळविण्यासाठीही अनेक विद्यार्थी रात्रंदिवस स्पर्धा परीक्षेची तयारी करीत आहेत. मात्र शासकीय नोकरीची जाहिरातही कधीतरी निघत असल्याने अनेकांच्या पदरी निराशाच पडत आहे. एमपीएससीमार्फतही राज्य सेवा पूर्वपरीक्षा घेण्याचे वेळापत्रक २०१९ मध्ये प्रसिद्ध करण्यात आले होेते. स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांनी अभ्यासिका, महागडे क्लासेस लावून अभ्यास सुरू केला होता. मात्र त्यानंतर कोरोनामुळे तब्बल चार वेळेस परीक्षा पुढे ढकलावी लागली. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या मानसिकतेवर परिणाम होत आहे. अखेर शासनाने २१ मार्च रोजी परीक्षा घेण्याचे नियोजन केले आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना काहीसा दिलासा मिळाला होता. मात्र आता याच दिवशी रेल्वे विभागाच्या वतीने विविध पदांसाठी घेण्यात येणारी परीक्षाही होणार आहे. एकाच दिवशी दोन्ही परीक्षा आल्याने यातील नेमकी कोणती परीक्षा द्यायची, या संभ्रमात विद्यार्थी पडले आहेत. रेल्वेची परीक्षा दिली तर एमपीएससीला मुकावे लागणार आहे आणि एमपीएससीची परीक्षा दिली तर रेल्वेच्या परीक्षेला मुकावे लागणार आहे.
रेल्वेची परीक्षा होणार ऑनलाइन
रेल्वे विभागाच्या वतीनेही मागील महिनाभरापासून विविध पदासाठी परीक्षा घेण्यात येत आहे. विद्यार्थी संख्या जास्त असल्याने टप्प्याटप्प्याने ऑनलाइन परीक्षा घेण्यात येत असून मराठवाड्यात नांदेड, औरंगाबाद, लातूर आदी ठिकाणी परीक्षा केंद्र असल्याचे विद्यार्थ्याने सांगितले.
परीक्षा केंद्रावर पोहोचण्यासाठी परीक्षार्थींची कसरत
एमपीएससी व रेल्वे परीक्षा केंद्रावर पोहोचण्यासाठी विद्यार्थ्यांला मोठी कसरत करावी लागणार असल्याचे चित्र आहे. कोरोनामुळे काही जिल्ह्यात संचारबंदी लागू केली आहे. तसेच बसस्थानकाशिवाय इतर ठिकाणी बस थांबविली जात नाही. प्रवासासाठी दुचाकी, तीनचाकी व चारचाकी वाहनांना नियम घालून देण्यात आले आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रावर पोहोचण्यासाठी धावपळ करावी लागणार आहे.
२१ रोजी दोन्ही परीक्षा
एमपीएससीसाठी विद्यार्थी - १५६०
परीक्षा केंद्र - ०६
दोन्ही परीक्षेची तयारी करणारे विद्यार्थी म्हणतात
राज्य सेवा परीक्षा व रेल्वे परीक्षा एकाच दिवशी घेण्यात येत आहे. त्यामुळे विद्यार्थी कोंडीत सापडला आहे. बरेच दिवस झाले शासकीय नोकर भरती नाही. त्यात शासन असे निर्णय घेत आहे. त्यामुळे आम्हा स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांचे मानसिक संतुलन बिघडत आहे. आता एका परीक्षेपासून वंचित राहणार असून, अभ्यास, मेहनत व
वेळ वाया जाणार आहे. असली परीक्षा पद्धत चुकीची आहे.
- संतोष ठेंगे, कळमनुरी
२१ मार्च रोजी एकाच दिवशी राज्य सेवा पूर्वपरीक्षा आणि रेल्वे भरतीसाठी परीक्षा घेतली जात आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांचे मोठे नुकसान होणार आहे. मानसिकतेवरही परिणाम होत असून एका परीक्षेची संधी निघून जात आहे. प्रत्येक पदाची परीक्षा वेगवेगळ्या दिवशी घ्यायला हवी.
- सुभाष मोगले, मासोड
चार वर्षांपासून स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करीत आहे. रेल्वे आणि राज्यसेवा पूर्वपरीक्षेसाठी फॉर्म भरला. आता एकाच दिवशी दोन्ही परीक्षा घेतल्या जात असल्याने गोंधळून तर गेलोच आहे. शिवाय एक संधीही हातची जणार आहे.
- अमोल हाके, तिरुपतीनगर, कळमनुरी