हिंगोली : शहरातील जुन्या पोलीस वसाहतीमधील शासकीय निवासस्थानांची दुरवस्था झाली असून ती कधीही कोसळून जीवित व वित्तहानी होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे ही निवासस्थाने तत्काळ रिकामी करावीत, अशा नोटिसा पोलीस अधीक्षक एम. राकेश कलासागर यांनी वसाहतीमध्ये राहणाऱ्या पोलीस अधिकारी, अंमलदारांना पाठविल्या आहेत. त्यामुळे ऐन पावसाळ्यात निवासस्थाने खाली करावी लागणार असल्याने कर्मचाऱ्यांची धावपळ होणार आहे.
शहरातील संत नामदेव पोलीस कवायत मैदानाच्या पाठीमागे पोलीस अधिकारी, कर्मचाऱ्यांसाठी जवळपास ३० ते ३५ वर्षांपूर्वी पोलीस वसाहत उभारण्यात आली आहेे. या वसाहतीमध्ये १२६ निवासस्थाने आहेत. शहराच्या मध्यभागी वसाहत असल्याने कर्मचाऱ्यांसाठी ही वसाहत सोयीची ठरत होती. त्यामुळे सर्व निवासस्थाने भरून राहत होती. कालांतराने निवासस्थानांची दुरवस्था होण्यास सुरुवात झाली. काही निवासस्थानांच्या भिंतीला तडे गेले असून स्वच्छतागृहांचीही दुरवस्था बनली आहे. तरीही सध्या ८० ते ८२ कर्मचारी कुटुंबीयांसह वास्तव्याला आहेत. शुद्ध हवा, मोकळा परिसर असल्याने कर्मचाऱ्यांना ही वसाहत सोडावीशी वाटत नाही. मात्र ही निवासस्थाने जुनी झाल्याने दुरवस्था बनली असून धोकादायक बनली आहेत. पावसामुळे निवासस्थाने कधीही कोसळून जीवित व वित्तहानी होण्याची शक्यता नाकारता येत नाही. सार्वजनिक बांधकाम विभाग व नांदेड येथील श्री गुरुगोविंदसिंघजी अभियांत्रिकी आणि तंत्रज्ञान महाविद्यालयाने निवासस्थानांचे सर्वेक्षण केले होते. यात ही निवासस्थाने धोकादायक असल्याचा निष्कर्ष काढला आहे. त्यामुळे ही निवासस्थाने तत्काळ रिकामी करावीत, अशा नोटिसा कर्मचाऱ्यांना बजावल्या आहेत. आतापर्यंत ६२ कर्मचाऱ्यांना नोटिसा पोहोचल्या असून उर्वरित कर्मचाऱ्यांना नोटिसा देण्याचे काम सुरू आहे.
बॉक्स
निवासस्थानांची दुरुस्ती करणेही अशक्य
शहरातील जुन्या पोलीस वसाहतीतील निवासस्थानांचे सर्वेक्षण श्री गुरुगोविंदसिंघजी अभियांत्रिकी आणि तंत्रज्ञान महाविद्यालयाने केले होते. यात ही निवासस्थाने धोकादायक असल्याचा अहवाल दिला आहे. तसेच या निवासस्थानांची दुरुस्ती करणेही अशक्य असल्याचे सार्वजनिक बांधकाम विभागाने सांगितले असल्याचे अधिकाऱ्याने सांगितले आहे.
बॉक्स
ऐन पावसाळ्यात कुठे जाणार?
पोलीस वसाहतीतील निवासस्थाने खाली करण्याच्या नोटिसा मिळाल्यानंतर वास्तव्यास असलेले कर्मचारी चांगलेच गोंधळून गेले आहेत. ऐन पावसाळ्यात आता कुठे घर शोधावे? या चिंतेत ते आहेत. नवीन पोलीस वसाहतीमध्येही दोन ते तीनच निवासस्थाने रिकामी असल्याची माहिती आहे. त्यामुळे जुन्या पोलीस वसाहतीमधील कर्मचाऱ्यांना आता किरायाच्या खोलीतच कुटुंब हलवावे लागणार आहे. मात्र कोरोना काळात किरायाचे घर शोधणेही अवघड बनल्याचे काही कर्मचाऱ्यांनी सांगितले. तसेच जुन्या निवासस्थानाची डागडुजी केल्यास आणखी तीन ते चार वर्षे तरी राहता येईल, अशा प्रतिक्रियाही काही कर्मचाऱ्यांनी व्यक्त केल्या.
कोट
जुन्या पोलीस वसाहतीतील निवासस्थानांची दुरवस्था झाली आहे. सार्वजनिक बांधकाम विभाग व श्री गुरुगोविंदसिंघजी अभियांत्रिकी आणि तंत्रज्ञान महाविद्यालयाने सर्वेक्षण केले असून ही निवासस्थाने राहण्यासाठी धोकादायक असल्याचे म्हटले आहे. त्यानुसार या वसाहतीमधील अधिकारी-कर्मचाऱ्यांना निवासस्थाने रिकामी करण्याच्या नोटिसा दिल्या आहेत.
- यशवंत काळे, अप्पर पोलीस अधीक्षक, हिंगोली.
फोटो :