हिंगोली: नगर परिषदेकडे नोंदणी नसलेल्या बुधवारी ६ टॉवरला तर गुरुवारी ९ टॉवरला सील केले आहे. कारवाईची मोहीम सुरू राहणार असल्याची माहिती मुख्याधिकारी डॉ. अजय कुरवाडे यांनी दिली.
१२ ऑगस्ट रोजी मुख्याधिकारी डॉ. अजय कुरवाडे यांच्या मार्गदर्शनाखाली पथक नेमून शहरातील ९ टॉवरवर कार्यवाही करत टॉवरला सील करण्यात आले. शहरात जवळपास मोबाईल कंपनीचे ३६ टॉवर आहेत. शहरातील नवा मोंढा, गणेशवाडी, मंगळवारा, वंजारवाडा, गवळीपुरा, मस्तानशाहनगर, बावनखोली, नारायणनगर, एनटीसी अशा विविध ठिकाणचे ९ टॉवर सील करण्यात आले. यामध्ये एअरटेल, रिलायन्स, आयडीया, वोडाफोन, इंडस्, एटीसी व इतर कंपन्यांच्या टॉवरचा समावेश आहे. सदर कंपन्यांवर कर आकारुन तो दंडासह कार्यालयामार्फत वसूल करण्यात येणार असल्याचेही नगर परिषदेने सांगितले.
... तर मालमत्तेचा लिलाव केला जाईल
ज्या कंपन्यांनी कर भरणा करण्यास कुचराई केली तर अशा कंपनीची मालमत्ता जाहीर लिलाव करून कराची रक्कम वसूल केली जाईल. वेळप्रसंगी त्यांंच्यावर नगर परिषदेमार्फत कार्यवाही करण्यात येणार आहे. गुरुवारी पथकप्रमुख उमेश हेंबाडे, उपमुख्याधिकारी संदीप घुगे, वरिष्ठ लिपीक विजेंद्र हेलचेल, लिपीक कैलास थिटे, सुनील चव्हाण, माधव घुगे, नितीन पवार, गजानन आठवले आदींनी ही कारवाई केली.