हिंगोली : ‘ब्रेक दी चेन’अंतर्गत जिल्हाधिकाऱ्यांनी १८ जून रोजी काढलेल्या नव्या आदेशात ११ जूनप्रमाणेच असलेल्या सर्व शिथिलता कायम ठेवण्यात आली असून, वेळेसह इतर कोणत्याही बाबीत बदल केला नसल्याचे दिसत आहे.
जिल्हा अजूनही स्तर २ मध्ये आहे. त्यामुळे जमावबंदी कायम आहे. जिल्ह्यात किराणा, भाजीपाला, फळ, बेकरी, मिठाई, चिकन, मटन, अंडी, पाळीव प्राणी खाद्य विक्रेते, पावसाळी हंगामपूर्व साहित्य विक्रेते यांची दुकाने सकाळी १० ते रात्री ८ या वेळेत चालू ठेवता येतील. दूध विक्री केंद्रांना सकाळी ७ ते रात्री ८ पर्यंत मुभा दिली. ई-कॉमर्स, कुरिअर, बजार समिती, कृषी संबंधित खते, बियाणे, अवजारे आदींसह दुरुस्तीची दुकानेही सकाळी १० ते रात्री ८ या वेळेत सुरू राहतील.
अत्यावश्यक सेवा वगळून इतर सर्व आस्थापना दुकानांनाही सकाळी १० ते रात्री ८ ची वेळ दिली. खानावळ, रेस्टॉरंट यांना कोरोना नियमांचे पालन करून ५० टक्के उपस्थिती मर्यादेत सकाळी १० ते रात्री ८ या वेळेत उघडण्यास परवानगी दिली. शासकीय व खासगी कार्यालयातील उपस्थिती १०० टक्के राहील. लग्नसमारंभ शक्यतो कोर्ट मॅरेज व शक्य नसल्यास वधू-वरांसह ५० जणांच्या उपस्थितीत पार पाडण्यास परवानगीची गरज नाही, अन्यथा तहसीलला पूर्वकल्पना देणे बंधनकारक राहील. अंत्यसंस्कारासाठी २० जण उपस्थितीला परवानगी असेल.
जिल्ह्याबाहेर खासगी वाहन, टॅक्सी, बस, रेल्वेने प्रवासाची परवानगी असेल. मात्र, राज्यातील स्तर ५ मध्ये येणाऱ्या जिल्ह्यात थांबण्यासाठी अथवा त्या जिल्ह्यातून प्रवासासाठी ई-पास बंधनकारक असेल. महामंडळाच्या बस पूर्ण क्षमतेने वाहतूक करू शकतील. मात्र, प्रवासी उभे राहून प्रवास करता येणार नाही. मास्कचा वापर अनिवार्य आहे. मालवाहतुकीसोबत केवळ तीन व्यक्तींना परवानगी राहील. खासगी, शासकीय बांधकामांनाही परवानगी राहणार आहे. बँका नियमित वेळेत सुरू राहणार असून, उद्योगही कोरोनाच्या नियमांचे पालन करून सुरू ठेवता येतील.
धार्मिक स्थळे, शाळा बंदच
जिल्ह्यातील धार्मिक स्थळे, प्रार्थना स्थळे, जत्रा, यात्रा, उरूस, मिरवणुका आदींना पुढील आदेशापर्यंत बंदी कायम आहे. तर शाळा, महाविद्यालये, कोचिंग क्लासेस बंद असतील. ऑनलाइन वर्ग घेण्यास परवानागी असेल. जिल्ह्यात आंदोलने, धरणे, उपोषणे, मोर्चा यांना पूर्णपणे बंदी असेल. या आदेशात ज्या दुकाने, आस्थापनांना परवानगी दिली, त्यांनीच दुकाने उघडायची आहेत. यात ज्यांचा उल्लेख नाही, त्यांना पुढील आदेशापर्यंत जिल्ह्यात बंदी असेल. या आदेशाचे उल्लंघन केल्यास दंडासह कायदेशीर कारवाईचा इशारा जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांनी दिला आहे.
सभागृहे अटींवर उपलब्ध
सार्वजनिक ठिकाणी, खुल्या मैदानात फिरणे, सायकलिंग, सर्व क्रीडा प्रकारांना परवानगी असेल तर इनडोअर क्रीडा प्रकारास सकाळी ५ ते ९ व सायंकाळी ५ ते रात्री ९ या वेळेत परवानगी असेल. जिल्ह्यात लॉन्स, मंगल कार्यालये यांना केवळ ५० नागरिकांच्या क्षमतेने लग्न सोहळा करता येईल. तर सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक सभा, बैठका इत्यादी कार्यक्रमांना हॉलच्या ५० टक्के क्षमतेच्या नागरिकांच्या उपस्थितीत कार्यक्रम आयोजण्यास परवानगी असेल.
जिमला ५० टक्क्यांची अट कायम
जिल्ह्यातील जिम, व्यायामशाळा, स्पा, केशकर्तनालय, ब्युटी पार्लर यांना केवळ ५० टक्के ग्राहकांच्या क्षमतेने दुकाने उघडण्यास परवानगी असेल. मात्र, वातानुकूलित यंत्र वापरता येणार नाही. सिनेमा हॉल, मल्टिप्लेक्सही ५० टक्के प्रेक्षकांच्या उपस्थितीत चालू करण्यास परवानगी असेल.