हिंगोली : गत दोन-तीन महिन्यांपासून महागाईने कळस गाठला आहे. पेट्रोल-डिझेलच्या दराने शंभरी पार केली आहे. दुसरीकडे भाजीपाला व किराणा वस्तूही महागल्यामुळे किचन कोलमडले गेले आहे.
सद्य:स्थितीत पेट्रोल व डिझेल बरोबरच किराणा व भाजीपाल्यात मोठी वाढ आहे. बाजारपेठेत आजमितीस मूग डाळ ९० रुपये किलो, तूर डाळ ९५ रुपये किलो, हरभरा डाळ ७० रुपये किलो, मसूर डाळ ७० रुपये किलो तर उडीद डाळ ९० रुपये किलो भावाने विकली जात आहे. तेलाचे भाव कमी होण्याऐवजी वाढलेले पाहायला मिळत आहेत. सोयाबीन १४० रुपये किलो, करडई तेल १९० रुपये किलो, सूर्यफूल तेल १६० रुपये किलो, शेंगदाणा तेल १६० रुपये किलो भावाने बाजारात विक्री होत आहे. तसेच गूळ ४० रुपये किलो, साखर ३४ रुपये किलो भावाने विकली जात आहे.
जिल्ह्यात पाणी भरपूर प्रमाणात असल्यामुळे भाजीपाला मोठ्या प्रमाणात पिकविला जात आहे. भाज्यांची आवक भरपूर प्रमाणात असली तरी भाजी मंडईत भाजीपाला महागला आहे. घासघीस केल्यानंतरच विक्रेते भाज्यांची किंमत थोडीसी कमी करीत आहेत. भाजी मंडईत शेवगा ६० रुपये किलो, आलू १५ रुपये किलो, वांगे ५० किलो, कांदे २० किलो, कोथिंबीर ४० किलो, पत्ता कोबी २० रुपये किलो, फूल कोबी ४० रुपये किलो, चवळी ३० रुपये किलो, टोमॅटो १५ रुपये किलो, काकडी २० रुपये किलो, कारले ४० रुपये किलो भावाने विकले जात आहेत.
शेवगा महागला...
सद्य:स्थितीत शेवग्याची आवक कमी आहे. शेवगा नाशिक जिल्ह्यातून येत आहे. दोन आठवड्यांपूर्वी शेवगा ४० रुपये किलो होता. आजमितीस शेवगा ६० ते ६५ रुपये किलो भावाने विकला जात आहे. पुढे चालून अजून भाव वाढण्याचीही शक्यता आहे.
भाजीपाल्यांचे दर...
शेवगा ६० रुपये किलो
शेवगा ६०
आलू १५
वांगे ५०
कांदे २०
डाळ स्वस्त, तेल महाग...
किराणा बाजारपेठेत तूर, मूग, उडीद, मसूर, हरभरा आदी डाळींचे भाव कमी आहेत; परंतु सोयाबीन, करडई, सूर्यफूल, शेंगदाणा आदी तेलाचे भाव कमी होण्याचे नाव घेत नाही. यामुळे गृहिणींचे बजेट कोलमडले आहे. महागाईने कळस गाठला असून किराणा वस्तूंचे भाव कमी होणे आवश्यक आहे.
घर चालविणे झाले कठीण...
गत तीन-चार आठवड्यांपासून किराणा तसेच भाजीपाला महाग झाला आहे. भाजीपाला स्वस्त होता त्यावेळेस दोन ते तीन भाज्या जेवणात असायच्या; परंतु हल्ली भाजीपाला महाग झाल्याने एकच भाजी ताटात राहत आहे.
-प्राची हरीश पुंडगे, गृहिणी
महागाईमुळे किराणा तसेच भाजीपालाही महागला आहे. २० रुपये किलो भावाने मिळणारी कोथिंबीर सद्य:स्थितीत ४० रुपये किलोने घ्यावी लागत आहे. दोन आठवड्यांपूर्वी शेवगा ४० रुपये किलो होता. आता ६० रुपये भावाने विकत घ्यावा लागत आहे.
-सीमा पिराजी घुगे, गृहिणी
ट्रॅक्टरची शेतीही महागली...
शेती नांगरटीसाठी अनेक शेतकऱ्यांना बैल मिळेना झाले आहेत. त्यामुळे उसने पैसे घेऊन शेतकरी ट्रॅक्टरच्या साह्याने शेती नांगरून घेत आहेत. सध्या पेट्रोल-डिझेलचे दर वाढले आहेत. त्यामुळे १८०० रुपये देऊन नांगरटी करून घ्यावी लागत आहे. शेतकऱ्यांना हे परवडणारे नाही.
-सुरेश चव्हाण, आडगाव (रंजे)
व्यापाऱ्यांची प्रतिक्रिया...
पेट्रोल-डिझेलचे दर वाढल्यामुळे भाजीपाल्यांची ने-आण करणे कठीण होऊन बसत आहे. महागाईने कळस गाठला असून छोट्या तसेच मोठ्या व्यापाऱ्यांनाही वाहन चालविणे कठीण होऊन बसत आहे.
-शेख मुजीब, भाजी विक्रेता
मोठ्या बाजारपेठेतून साखर, गहू, ज्वारी, सर्व डाळी तसेच तेल विकत आणावे लागत आहे. अशा वेळी मोठे वाहन करावे लागते. पेट्रोल-डिझेलचे दर वाढल्यामुळे वाहनचालकांनी वाहनांचे भाडेही वाढविले आहे. किराणा व्यापाऱ्यांना परवडणारे नाही.
-नितीन शाहू, किराणा व्यापारी