हिंगोली : केंद्र व राज्य शासनाच्या वतीने राज्यातील निराधार लाभार्थ्यांना अनुदान दिले जाते. मात्र, अनेक ठिकाणी बोगस लाभार्थी आढळून येत असल्याने अशा लाभार्थ्यांची इतर जिल्ह्यांत तपासणी केली जात आहे. हिंगोली जिल्ह्यात मात्र अजूनही बोगस लाभार्थी शोधमोहीम हाती घेण्यात आलेली नाही.
केंद्र व राज्य शासनाच्या वतीने संजय गांधी निराधार अनुदान योजना, श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्तिवेतन योजना, इंदिरा गांधी वृद्धापकाळ निवृत्तिवेतन योजना, इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा निवृत्तिवेतन योजना, अपंग निवृत्तिवेतन योजना राबविण्यात येते. या योजनेअंतर्गत पात्र लाभार्थी निवडून त्यांच्या बँक खात्यावर मंजूर रक्कम जमा केली जाते. मात्र, योजनेचा लाभ घेण्यासाठी अनेक जण बोगस कागदपत्रे देऊन लाभ घेण्याचा प्रयत्न करतात. अशा बोगस लाभार्थ्यांचा इतर जिल्ह्यांत शोध घेण्याचा प्रयत्न केला जात आहे. यासाठी मंडळ अधिकारी, तलाठी, ग्रामसेवक, पोलीस पाटील, आदी कर्मचाऱ्यांची मदत घेतली जात आहे. तसेच यामध्ये वयाचा पुरावा, उत्पन्न प्रमाणपत्र, आदींची पडताळणी केली जात आहे. मात्र, हिंगोली जिल्ह्यात अद्यापही बोगस लाभार्थी शोधमोहीम हाती घेण्यात आली नाही. त्यामुळे बोगस लाभार्थ्यांना रान मोकळे झाले आहे. पात्र लाभार्थी निवडताना पुरावा असलेल्या कागदपत्रांच्या आधारेच लाभार्थी निवडले जात असल्याचा दावा प्रशासनातर्फे केला जात असला, तरी अनेकजण विविध कारणे देऊन योजनेसाठी लागणारी बोगस कागदपत्रे काढण्यात पटाईत आहेत. त्यामुळे जिल्ह्यात बोगस लाभार्थी शोधमोहीम कधी राबविली जाणार, याकडे लक्ष लागले आहे.
जिल्ह्यात असे आहेत पात्र लाभार्थी
संजय गांधी निराधार अनुदान योजना (सर्वसाधारण) १० हजार ९५६, संजय गांधी निराधार अनुदान योजना (अनु. जाती) २ हजार ६८४, संजय गांधी निराधार अनुदान योजना (अनु. जमाती) ८९८, श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्तिवेतन योजना (सर्वसाधारण) २२ हजार ८८७, श्रावणबाळ राज्य निवृत्तिवेतन योजना (अनु. जाती) ४ हजार ९७८, श्रावणबाळ राज्य निवृत्तिवेतन योजना (अनु. जमाती) १ हजार ३८८, इंदिरा गांधी वृद्धापकाळ निवृत्तिवेतन योजना १५ हजार ५३८, इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा निवृत्तिवेतन योजना ८४५, इंदिरा गांधी राष्ट्रीय अपंग निवृत्तिवेतन योजना १०५.