हिंगोली : जिल्हा परिषदेत अविश्वास ठरावाच्या विरोधात उभे राहणाऱ्या सदस्यांची कामे अडविली जात असून, अशा कामांची प्रशासकीय मान्यता झालेली असताना कोणतेही कारण नसताना काम अडविल्यास गाठ माझ्याशी आहे, असा इशारा आमदार तान्हाजी मुटकुळे यांनी दिला. सीईओ आर. बी. शर्मा यांच्या उपस्थितीत शिष्टमंडळासह त्यांनी अधिकाऱ्यांची हजेरी घेतली.
अविश्वास ठरावाच्या समर्थनार्थ राहिलेल्या सदस्यांनाच सोबत घेऊन सत्ताधारी कारभार करू लागले आहेत; तर अविश्वासाच्या विरोधात गेलेल्यांनाच आता विरोधक समजले जात आहे. त्यामुळे कामाच्या अडवाअडवीचे प्रकारही घडत आहेत. मात्र त्याला समित्यांचा आधार दिला जात आहे. बहुमतापुढे विरोधकांना हात टेकावे लागत आहेत. प्रशासन विविध कारणे सांगून वेळ मारून नेत असल्याचा आरोप करीत सदस्यांनी आ. तान्हाजी मुटकुळे यांना साकडे घातले. आ. मुटकुळे यांनी मंगळवारी सीईओ आर. बी. शर्मा यांची भेट घेतली. त्यांच्यासमोर विविध कामांची यादीच सादर करून ही कामे निविदेत आल्यावर का राेखली? असा सवाल केला. त्यावर शर्मा यांनी संबंधित विभागप्रमुखांना पाचारण केले. त्यामध्ये बांधकामचे कार्यकारी अभियंता लवेश तांबे यांना सदस्यांनी ही कामे थांबविण्याचे कारण विचारले असता, अध्यक्षांनी तसे पत्र दिल्याचे सांगितले. तर आम्हाला तसे लेखी द्या, असे सांगितले असता ‘दोन दिवसांत सांगतो,’ असे उत्तर दिले. शिक्षणाधिकारी संदीपकुमार सोनटक्के यांनीही ‘समितीने घेतलेल्या निर्णयाप्रमाणे कारवाई केली जाते. मी माझे मत मांडू शकतो,’ असे उत्तर दिले; तर मुख्य लेखा व वित्त अधिकारी मनोज पाते यांनाही मार्च एंडच्या मुद्द्यावरून अडचणीत आणण्याचा प्रयत्न केला असता त्यांनीही मार्च एंड संपल्याचे सांगितले. यावेळी माजी सभापती रत्नमाला चव्हाण, सदस्या सुवर्णमाला शिंदे, शिवहार नरवाडे, विलास रायवाडे, आदींची उपस्थिती होती.
सीईओंचे टिपिकल उत्तर
या सर्व प्रकारात सीईओ आर. बी. शर्मा यांनी मी आपल्या सर्वांच्या तक्रारींवर नियमानुसारच कामे करण्याचे पत्र दिल्याचे सांगितले; तर विषय समितीचा निधी नियोजनाचा हक्क आहे. त्यात विभागप्रमुख सचिव या नात्याने मत मांडू शकतात. सध्या जे वातावरण आहे, ते माहितीच आहे, असे सांगितले. त्यांनी थेट विभागप्रमुखांनाच समोर केल्याने या तक्रारींचे काय होणार? हे सांगायची गरज नाही.
... तर १ तारखेला पुन्हा भेटणार
जर ३० जूनपर्यंत सदस्यांच्या या पत्रांचा विचार करून त्यावर निर्णय झाला नाही तर १ तारखेला पुन्हा आपल्या भेटीला येणार आहोत. बेकायदेशीर कामे केल्यास गाठ माझ्याशी आहे. विधिमंडळात यावर प्रश्न उपस्थित करण्याचा इशारा आ. मुटकुळे यांनी दिला.
गटनेता बदलाचे पत्र
सध्या जिल्हा परिषदेत भाजपचे गटनेतेपद पुष्पाताई प्रकाशराव थोरात यांच्याकडे आहे. मात्र आज भाजपच्या नऊ सदस्यांच्या स्वाक्षरीसह जिल्हाध्यक्षांकरवी गटनेतेपदी शिवहार नरवाडे यांची निवड केल्याचे पत्र सामान्य प्रशासन विभागास देण्यात आले.