वानरांचा बंदोबस्त करण्याची मागणी
हिंगोली: अन्न व पाण्याच्या शोधात वानरांची टोळी शहरात दाखल झाली आहे. घराच्या छतावरुन उड्या मारत छोटी-मोठी वानरे अंगणात ठेवलेल्या वस्तुंची नासाडी करीत आहे. शहरातील शिवाजीनगर,जिल्हा परिषद परिसर, खटकाळी, तोफखाना, रेल्वे स्टेशन परिसर आदी भागात वानरांनी उच्छाद मांडला आहे. वन विभागाने वानरांच्या टोळीचा बंदोबस्त करावा, अशी मागणी नागरिकांतून होत आहे.
वीज खंडित होत असल्याने शेतकरी त्रस्त
कळमनुरी: शहरासह परिसरातील वीजपुरवठा वारंवार खंडित होत आहे. गत पंधरा-वीस दिवसांपासून तर वीज खंडित होण्याचे प्रमाण अधिक वाढले आहे. काही ठिकाणी भारनियमनाव्यतिरिक्त वीज खंडित होत आहे. परिणामी विहिरींना पाणी असूनही पिकांना देता येत नाही. त्यामुळे पिके वाळून जात आहेत. महावितरण कंपनीने या बाबीची तात्काळ दखल घेऊन तालुक्यातील वीजपुरवठा सुरळीत करावा, अशी मागणी होत आहे.
नांदेड नाक्यावरील डांबर वितळू लागले
हिंगोली: शहरातील नांदेड नाका ते उड्डाणपुलापर्यतच्या रस्त्याचे काही दिवसांपूर्वी डांबरीकरण करण्यात आले आहे. नांदेड नाक्यावर जास्त प्रमाणात डांबर टाकल्या गेल्यामुळे ते उन्हामुळे वितळू लागले आहे. परिणामी वाहनचालकांसाठी ते धोकादायक झाले आहे. ज्या ठिकाणी डांबर जास्त प्रमाणात पडले आहे त्या ठिकाणी गिट्टीचा चुरा टाकून दबई करावी, अशी मागणी वाहनचालकांनी केली आहे.
मिरचीवर फवारणी करण्याचे आवाहन
हिंगोली: जिल्ह्यात मिरची पिकावर चुरडा, मुरडा रोगाचा प्रादुर्भाव दिसून आल्यास फिप्रोनिल ५ टक्के १० मिली किंवा थायामिथॉक्झाम १२.६ टक्के, लॅमडा सायहॅलोथ्रीन ९.५ टक्के ३ मिली प्रती १० लिटरत पाण्यात मिसळून फवारणी करावी. कमाल तापमानात वाढ होण्याचा अंदाज लक्षात घेता उन्हाळी हंगामासाठी लागवड केेलेल्या भाजीपाला पिकात आवश्यकतेनुसार पाण्याचे व्यवस्थापन करावे, असे आवाहन ‘वनामकृ’ विद्यापीठाने केले आहे.
संत्रा, मोसंबी पिकांना आवश्यकतेनुसार पाणी देण्याचे आवाहन
हिंगोली: कमाल तापमानात वाढ होण्याचा अंदाज लक्षात घेता संत्रा, मोसंबी बागेत आवश्यकतेनुसार पाणी व्यवस्थापन करावे. लिंबूवर्गीय पिकांमध्ये कोळी किडींचा प्रादुर्भाव दिसून आल्यास डायकोफॉल १८.५ टक्के २ मिली किंवा प्रोपरगाईट २० टक्के एक मिली किंवा इथिऑन २० टक्के २ मिली किंवा विद्राव्य गंधक ३ ग्रॅम प्रती लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी, असे आवाहन ‘वनामकृ’ विद्यापीठाने केले आहे.
स्वच्छता मोहीम राबविण्याची मागणी
हिंगोली: येथील बसस्थानकात मागील काही दिवसांपासून कचऱ्याचे ढीग पहायला मिळत आहेत. वाऱ्याची झुळूक आल्यास कचरा प्रवाशांच्या अंगावर उडून येत आहे. महामंडळाच्या संबंधित विभागाला वेळोवेळी सांगूनही अद्याप लक्ष दिले गेेले नाही. आगारप्रमुखांनी याची दखल घेऊन बसस्थानकात स्वच्छता मोहीम राबवावी, अशी मागणी प्रवाशांनी केली आहे.