हिंगोली: लसीकरण करून घेण्यासाठी ज्येष्ठांबरोबरच आता युवकांतूनही प्रतिसाद मिळत आहे. लसीकरणाच्या ठिकाणी होत असलेली गर्दी पाहून जिल्हा प्रशासनाच्या आदेशाप्रमाणे शहरात चौथे केंद्र निर्माण करण्यात आले आहे. नागरिकांनी गर्दी न करता, मास्क घालूनच लसीकरण करून घ्यावे, असे आवाहन मुख्याधिकारी डॉ.अजय कुरवाडे यांनी केले आहे. काही दिवसांपूर्वी जिल्हा सामान्य रुग्णालयात लसीकरण करण्यात येत होते, परंतु या केंद्राच्या बाजूलाच कोरोना चाचण्या होत असल्यामुळे काही बाधित व्यक्ती लसीकरण केंद्रात येत होत्या. हे पाहून जिल्हा प्रशासनाने शहरातील कल्याण मंडपम् येथे पहिल्या आणि दुसऱ्या मजल्यावर लसीकरणाची सोय करून दिली आहे. कल्याण मंडपम् येथे आता दोन केंद्र अस्तित्वात आहेत. येथेही गर्दी होत असल्याचे पाहून जिल्हा प्रशासन आणि जिल्हा रुग्णालयाच्या मार्गदर्शनाखाली मुख्याधिकारी कुरवाडे यांनी पुढाकार घेत, सरजूदेवी विद्यालय १ आणि माणिक स्मारक आर्य विद्यालय येथे १ असे ४ नव्याने लसीकरणासाठी केंद्र निर्माण करण्यात आले आहेत. त्यामुळे नागिरकांना लसीकरण करणे सोपे होणार आहे.
११ मे रोजी शहरातील माणिक स्मारक आर्य विद्यालय केंद्र सकाळी ११ वाजता सुरू करण्यात आले. यावेळी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.शिवाजी पवार, मुख्याधिकारी डॉ.अजय कुरवाडे, स्वच्छता निरीक्षक बाळू बांगर, निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ.गोपाळ कदम, अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.प्रेमकुमार ठोंबरे, डॉ.अजहर देशमुख आदींनी भेट दिली. यावेळी गजानन टाले, गणेश बांगर, चेतन बुजवणे, दिनकर शिंदे, गालफाडे आदींची उपस्थिती होती.