रस्त्यांची दुरवस्था ; वाहनचालक त्रस्त
पुसेगाव: सेनगाव तालुक्यातील पुसेगावसह परिसरातील रस्त्यांची अत्यंत दुरवस्था झाली आहे. रस्त्यांवर पडलेल्या खड्ड्यामुळे वाहनांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. काही रस्त्यावरुन पायी चालणे देखील कठीण होऊन बसले आहे. संबंधित विभागाने याची दखल घेऊन रस्त्यांवरील खड्डे बुजवावेत, अशी मागणी या भागातील नागरिकांनी केली आहे.
स्वच्छता मोहीम राबविण्याची मागणी
कळमनुरी: शहरातील बसस्थानकात मागील काही दिवसांपासून कचऱ्याची ढिगारे पडलेली पहायला मिळत आहेत. कचऱ्याच्या दुर्गंधीमुळे प्रवाशांना त्रास होत आहे. वेळीच एस. टी. महामंडळाच्या आगारप्रमुखांनी लक्ष देवून बसस्थानकात स्वच्छता मोहीम राबवावी, अशी मागणी प्रवाशांनी केली आहे.
नाल्या साफ करण्याची मागणी
हिंगोली: शहरातील तोफखाना, इंदिरानगर, मंगळवारा आदी भागातील नाल्या साफ केल्या नाहीत. त्यामुळे नाल्यांतील पाणी रस्त्यावर येत आहे. नगरपरिषदेच्या स्वच्छता विाभागाने याची दखल घेऊन नाल्याची साफसफाई करुन नाल्यांवर औषध फवारणी करावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.
उड्डाण पुलावर वाहतूक वाढलीहिंगोली: शहरातील उड्डाण पुलावर मागील काही दिवसांपासून वाहनांची वर्दळ वाढली असून येथे दुभाजक नसल्यामुळे छोटे-मोठे अपघात आहेत. काही वाहनचालक भरधाव वेगाने वाहने चालवित आहेत. त्यामुळे पादचाऱ्यांना भीती वाटत आहे. संबंधित विभागाने याची दखल घेऊन रेल्वे उड्डाण पुलावर दुभाजक बसवावे,अशी मागणी या भागातील नागरिकांनी केली आहे.