हिंगोली : हरभरा पिकाच्या परिपक्वतेच्या काळात पाने पिवळी पडतात आणि घाटे वाळू लागतात. तेव्हा शेतकऱ्यांनी हरभरा पिकाची काढणी वेळेत करावी, असा सल्ला वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाच्या ग्रामीण कृषी मौसम सेवा विभागाचे मुख्य प्रकल्प समन्वयक डॉ. कैलास डाखोरे यांनी दिला आहे.
जिल्ह्यातील अनेक भागांमध्ये हरभरा पीक काढणीस आले आहे. पाने पिवळी पडल्याने घाटेही वाळून जाऊन शेतकऱ्यांचे नुकसान होते. कापणीस तयार असलेल्या करडईची कापणी वेळेवर करून सुरक्षित ठिकाणी साठवणूक करावी. करडई पिकाला काटे असल्याने याची कापणी सकाळी करावी. हाताला काटे टोचू नयेत म्हणून कापतेवेळेस कपडा किंवा हातमोजे घालावेत. दुसरीकडे उसाची लागवड करून एक महिन्याचा कालावधी झाला असल्यास नत्राची दुसरी मात्रा ४० टक्के देऊन नंतर उसाला पाणी द्यावे. त्याचबरोबर हळदीची पाने पिवळी पडून जमिनीवर लोळतात तेव्हा हळदीची त्वरित कापणी करावी, असेही आवाहन करण्यात आले आहे.