शिंदे यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात निवेदन दिले. यावेळी ते म्हणाले, दरवर्षी सोयाबीन, कापूस, तूर, मूग अशी पारंपरिक पिके घेतो. कधी कोरडा तर कधी ओला दुष्काळ या पिकांची वासलात करीत आहे. वर्षभर राबूनही हातातोंडाची मिळविणी होत नाही. यामुळे डोक्यावर कर्जाचा डोंगर चढला आहे. आता कोणतेही पीक घेतले तर या परिस्थितीतून बाहेर पडणे शक्य नाही. आत्महत्या हाच पर्याय उरला. मात्र ते मनाला पटणारे नाही. त्यामुळे आयुर्वेदिक वनस्पती असलेल्या गांजाची लागवड करण्याची परवानगी जिल्हाधिकाऱ्यांकडे मागितली आहे. या पिकावर महाराष्ट्रात बंदी घातलेली आहे. इतर काही राज्यात हे पीक घेतात. त्यांना औषधी कंपन्यांकडून मागणी आहे. चांगला भावही मिळतो. त्यामुळे मरणापेक्षा या गांजा पिकाची शेती करून परिस्थिती सुधारावी, या अपेक्षेने मागणी केली आहे. दरम्यान, शिंदे हे शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते असून गेल्या अनेक दिवसांपासून या संघटनेतही ते काम करतात.
गांजा याच पिकासाठी परवानगीची मागणी का? असे विचारले असता पपई, केळी, ऊस अशी अनेक पिके घेतली. मात्र कशातच आर्थिक फायदा झाला नाही. शेत पडिक ठेवणे अथवा विकून टाकणे हाच पर्याय राहिला. शेवटी गांजा हेच कमी खर्चात जास्त भाव देणारे पीक असल्याने त्याची मागणी केली असे शिंदे म्हणाले.