जि.प.अध्यक्ष गणाजी बेले यांच्या अध्यक्षतेखालील सभेस सीईओ आर.बी. शर्मा, उपाध्यक्ष मनीष आखरे यांची उपस्थिती होती. या बैठकीस आज जिल्हा नियोजन अधिकारी किरण गिरगावकर व आदिवासी विभागाचे प्रकल्प अधिकारी डॉ. विशाल राठोड यांनाही पाचारण करण्यात आले होते. मात्र, सभागृहात अध्यक्ष व उपाध्यक्षांशिवाय इतर कोणीही आले नाही. त्यामुळे शेवटी सत्ताधारी गटाचेच चार ते पाच सदस्य सभागृहात हजर झाले. त्यात सभेची वेळ सुरू झाल्यापासून पंधरा ते वीस मिनिटे होऊनही कोणी आले नसून, ११ सदस्यच हजर झाले आहेत. कोरम पूर्ण होण्यासाठी १९ सदस्यांची आवश्यकता असल्याचे उपमुकाअ डी.आर. माळी यांनी सांगितले. त्यानंतर जि.प.सदस्य अनिल पतंगे यांनी सदस्यच हजर नसतील तर सभा तहकूब करून पुढच्या तारखेत घेण्याची मागणी केली. त्यानंतर अध्यक्षांनी सभा तहकूब झाल्याचे घोषित केले.
या सभेला आज पहिल्यांदाच नवे दोन अधिकारी पाहुणे म्हणून आले. ते काही माहिती सादर करणार होते. शिवाय सदस्यांच्या प्रश्नांना उत्तरेही देणार होते. मात्र, ही सभाच झाली नसल्याने तसे काहीच घडले नाही. सभागृहात हजेरी लावण्यापुरतेच काम झाले.
ही सभा तहकूब झाल्यानंतर विरोधकांनी सभेच्या ठिकाणी हजेरी लावून कोरम पूर्ण करण्याचा प्रयत्नही केला नसल्याबाबत एकच चर्चा हाेताना दिसत होती. शिवाय सत्ताधारी सभा तहकूब करण्याच्या तयारीत असल्याची कुणकुण त्यांना आधीच असल्याने त्यांनी सभागृहाकडे पायही ठेवला नसल्याचे दिसत होते.