जि.प.सभापती रत्नमाला चव्हाण यांच्यावरील अविश्वासापासून गतिमान झालेल्या या हालचालींनंतर आता इतर राजकीय वाद समोर येऊ लागले आहेत. भाजपमधील दुही जशी बैठकीच्या निमित्ताने समोर आली. विद्यमान जिल्हाध्यक्ष शिवाजी जाधव व आ. तान्हाजी मुटकुळे यांचा गट एकमेकांना पाण्यात पाहण्यासाठी एकही संधी सोडत नसल्याचे दिसत आहे. एवढेच काय तर आ. मुटकुळे यांनी अविश्वासाच्या विरोधात न मतदान केल्याने जि.प. गटनेत्या पुष्पा थोरात यांच्या मतदारसंघातील कामांबाबत पत्रही देऊन टाकले. राष्ट्रवादीतील वाद तर आहेच. आ.राजू नवघरे यांचा वाढता वरचष्मा लक्षात घेता आता सभापती निवडीच्या वेळी माजी मंत्री जयप्रकाश दांडेगावकर यांची भूमिका काय राहते? हे पाहणे रंजक ठरणार आहे. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील हेही हिंगोली जिल्हा दौऱ्यावर येत आहेत. त्यावेळी राष्ट्रवादीतील वाद समोर येतील, असे दिसते.
शिवसेनेच्याही गोटात काही सगळेच आलबेल आहे, असे नाही. शिवसेनेचा वर्धापन दिन झाला. त्यात खा.हेमंत पाटील यांचेच छायाचित्र गायब असल्याचे प्रकर्षाने जाणवले. तर सभापतींवरील अविश्वासाच्या वेळी शिवसेनेचेच तब्बल चार सदस्य गैरहजर राहिल्याने येथे वाद आहेत, हे समोर आले असून मध्यवर्ती कार्यालयाला त्याची दखल घ्यावी लागली. एवढेच नव्हे, तर वसमत विधानसभेत जुने व नवे असा वाद सुरू झाला असून माजी मंत्री जयप्रकाश मुंदडा यांनीच या वादाला फोडणी दिल्याने येथेही कधी भडका उडेल, हे सांगणे अवघड आहे.
काँग्रेस पुन्हा त्याच मार्गावर
हिंगोली जिल्ह्यात स्व.खा.राजीव सातव व माजी आ. भाऊराव पाटील गोरेगावकर यांचे गटातटाचे राजकारण नवे नाही. मागील सहा -सात वर्षांत त्याचा मोठा राजकीय फटका पक्षाने सोसला. अजूनही काँग्रेस त्याच मार्गावर जाण्याची चिन्हे दिसत आहेत. दोन्ही गटांनी मुंबईत जाऊन एकमेकांच्या उखाळ्या-पाकाळ्या केल्या. पक्षश्रेष्ठींनी मात्र दोघांनाही दाद न देता सज्जड दम भरला. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेची तयारी करा त्यानंतर पाहू, असा श्रद्धा व सबुरीचा सल्ला दिला.
पक्षीय वादांचीही ठिणगी
हिंगोली नगरपालिकेत नाईलाजाने का होईना मात्र नगराध्यक्ष भाजपचे बाबाराव बांगर तर उपनगराध्यक्ष राष्ट्रवादीचे दिलीप चव्हाण अशी विचित्र स्थिती आहे. तरीही हे दोघे म्हणजे एकाच नाण्याच्या दोन बाजू मानल्या जायच्या. आता न.प. निवडणुका जवळ येत आहेत. त्यामुळे या दोघांत श्रेयवादाचा कलगीतुरा रंगत आहे. महेश नवमीच्या दिवशी आ.तान्हाजी मुटकुळे यांच्या साक्षीने हे दोघे चांगलेच भडकले. प्रस्ताव राष्ट्रवादीच्याच काळात आले, मंजूरही होते. निधी फक्त एकदा भाजपच्या काळात आला. नंतर महाविकास आघाडीनेच दिला, असा चव्हाण यांचा युक्तिवाद होता. तर बांगर यांनी आमच्याच काळात या सगळ्या योजना मंजूर झाल्या. इतरही निधी मिळाला. शहराचा चेहरा आम्हीच बदलला, असे सांगून वरकडी केली. त्यामुळे घरी बसून प्रस्ताव मंजूर होत नाही. मंत्रालयात मीच आ. मुटकुळेंसोबत दारोदार फिरल्याचे चव्हाण यांनी सांगताच वाद भडकला होता. न.प. निवडणुकीपूर्वीच वादाची ठिणगी पडू लागली आहे.