२३ मार्च २०२० पासून कोरोना महामारीने सर्वत्र शिरकाव केला आहे. त्यामुळे शासनाच्या आदेशाप्रमाणे मोतीबिंदू शस्त्रक्रिया या बंद करण्यात आलेल्या आहेत. कोरोनाआधी जिल्हा सामान्य रुग्णालयात महिन्याकाठी ६० ते ७० मोतीबिंदू शस्त्रक्रिया यशस्वी पार पडत होत्या. शस्त्रक्रियेनंतर सर्व रुग्णांना औषधोपचार केले जायचे. गरज पडल्यास दाखल करुन बेडचीही व्यवस्था केली जायची, असेही रुग्णालयाच्या वतीने सांगण्यात आले.
डिसेंबर २०२०, त्यानंतर जानेवारी, फेब्रुवारी आणि मार्चच्या पहिल्या आठवड्यापर्यंत एकूण १८७ शस्त्रक्रिया पार पडल्या. यात ‘आयओएल’ १८३ आणि ‘पीएलएआयएन’ या ४ अशा शस्त्रक्रियेचा समावेश आहे. सदरील शस्त्रक्रिया डाॅ. चंद्रशेखर अपनगिरे, डाॅ. सोनाली कदम, डाॅ. सुनील गुडेवार, डाॅ.फेदडकर यांनी पार पाडल्या. सध्यातरी शस्त्रक्रिया विभाग बंद पडल्याने अनेक समस्या उद्भवत आहेत.
अंधार कधी दूर होणार?
गत दीड वर्षापासून कोरोना महामारीमुळे सळो की पळो करुन सोडले आहे, डोळे दुखतात, खाजवतात, डोळ्यांत पाणी येते, डोळ्यांच्या कडा दुखतात? असे एक ना अनेक प्रश्न समोर आहेत. शस्त्रक्रिया कराव्या म्हटले तर शस्त्रक्रिया विभाग हा कोरोना महामारीमुळे बंद करण्यात आला आहे. कोरोना महामारी संपुष्टात आल्यानंतरच सुरु होईल, असे जिल्हा रुग्णालयातील डाॅक्टरांनी सांगितले. फारच त्रास झाला तर खासगी डाॅक्टरांकडे जावे लागते. त्यामुळे आर्थिक बाबी समोर येतात. जिल्हा सामान्य रुग्णालयातील डोळ्यांचा शस्त्रक्रिया विभाग सुरु करणे गरजेचे आहे, अशी प्रतिक्रिया काही रुग्णांनी व्यक्त केली.
प्रतिक्रिया
गेल्या दीड वर्षापासून कोरोनाचे रुग्ण दिवसेंदिवस वाढत आहेत. डिसेंबर २०२० आणि त्यानंतर २०२१ मध्ये जानेवारी, फेब्रुवारी आणि मार्च महिन्याच्या पहिल्या आठवड्यात जवळपास १८७ मोतीबिंदू शस्त्रक्रिया केल्या. कोरोना महामारीचा उद्रेक वाढल्यामुळे या आजाराचा संसर्ग डोळ्यांच्या रुग्णांना होऊ नये म्हणून जिल्हा सामान्य रुग्णालयाने काळजी घेत पुढील आदेश येईपर्यंत डोळ्यांच्या शस्त्रक्रिया बंद केल्या आहेत. किरकोळ आजार असेल तर औषधोपचार रुग्णांना करत आहोत.
- डाॅ. चंद्रशेखर अपनिगरे, नेत्ररुग्ण विभागप्रमुख