बसथांब्यांची दुरवस्था
हिंगोली : जिल्ह्यातील प्रमुख मार्गावरील उभारलेल्या बसथांब्यांची दुरवस्था झाली आहे. हिंगोली ते नांदेड या मार्गावरील उमरा, मसोडफाटा, मोरवाडी, माळेगाव, पार्डीमोड, साळवा, कामठाफाटा, आदी ठिकाणी बसथांबे आहेत. मात्र, या बसथांब्याची दुरवस्था झाली असून, प्रवाशांना झाडांच्या सावलीचा आसरा घ्यावा लागत आहे.
अवैध वाळू उपसा सुरू
हिंगोली : जिल्ह्यातून वाहणाऱ्या कयाधू नदीसह मोठे ओढ्यातून वाळू उपसा मोठ्या प्रमाणात केला जात आहे. कयाधू नदीवरील वाळूघाटांचा लिलाव अद्याप झाला नाही. मात्र, अवैध उपसा करून वाळूमाफीया राजरोसपणे वाळूची विक्री करीत आहेत. ग्रामपंचायत निवडणुकीत प्रशासन व्यस्त असल्याने याचा फायदाही वाळूमाफीया घेत आहेत.
तूर उत्पादनात घट
हिंगोली : जिल्हाभरात बहुतांश शेतकऱ्यांनी तूर पीक घेतले आहे. सध्या तूर पिकाची काढणी वेगाने सुरू आहे. मात्र, उत्पादनात घट होत असून, शेतकऱ्यांचे नुकसान होत आहे. सोयाबीन, कापूस या पिकांनी दगा दिल्यानंतर तूर पिकावर शेतकऱ्यांची आशा होती. परंतु, तुरीचे उत्पादनही घटत असल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडले आहेत.
गिरगाव ते टोकाई गड रस्ता नादुरुस्त
कुरुंदा : वसमत तालुक्यातील गिरगाव ते टोकाई गड हा दहा किलोमीटरचा रस्ता मागील काही दिवसांपासून खड्डेमय झाला आहे. या रस्त्यावरून वाहने चालविणे कठीण झाले आहे. वेळोवेळी संबंधित विभागाला सांगितले. परंतु, कोणीही याकडे लक्ष दिले नाही. वेळीच याची दखल घेऊन हा खड्डेमय रस्ता दुरुस्त करावा, अशी मागणी वाहनचालकांनी केली आहे.
अस्ताव्यस्त वाहनांमुळे वाहतुकीची कोंडी
कळमनुरी : शहरातील मुख्य रस्त्यावर मागील काही दिवसांपासून वाहने अस्ताव्यस्तपणे उभी केली जात आहेत. त्यामुळे इतर वाहनांना रस्ता सापडत नाही. अस्ताव्यस्तपणे वाहने उभी केल्यामुळे वाहतुकीची कोंडी होत आहे. वेळीच याची संबंधित विभागाने दखल घेऊन अस्ताव्यस्तपणे वाहने उभी करणाऱ्यांंना सूचना द्यावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.