हिंगोली : मकर संक्रांत ते रथसप्तमी यादरम्यान महिला एकमेकींना वाणांची देवाण-घेवाण करतात. त्यानिमित्त महिला घराबाहेरही पडत आहेत; परंतु कोरोना आजाराचा धोका अजून कमी झालेला नाही, हे लक्षात घेऊन वाण देवाण-घेवाण करावी. वाणातून कोरोना तर पसरत नाही ना? अशी भीतीही महिलांतून व्यक्त होत आहे.
कोरोनाच्या संसर्गामुळे मकर संक्रांत हा सण महिलांनी यावर्षी साधेपणाने साजरा केला. मकर संक्रांतीचे वाण देवाण-घेवाण करण्याचा कार्यक्रम रथसप्तमीपर्यंत चालतो. यावर्षी कोरोनाचे संकट असल्यामुळे बाजारपेठेत गर्दी करू नये, मास्कचा पुरेपर वापर करावा, सॅनिटायझरने हात धुवावे, सामाजिक अंतर ठेवावे, असे आवाहन जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या वतीने करण्यात आले आहे. जिल्ह्यात कोरोनाचे रुग्ण कमी झालेले नाहीत. १४ जानेवारी रोजी १० पॉझिटिव्ह, १५ जानेवारी रोजी ६, १६ जानेवारी रोजी ७, १७ जानेवारी रोजी ९, १८ जानेवारी १२ रुग्ण पाॅझिटिव्ह आढळून आले आहेत. तेव्हा संक्रांतीच्या वाणातून कोरोना तर पसरत नाही ना, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. एकमेकांप्रती स्नेह व्यक्त करण्याचा सण म्हणजे मकर संक्रांत होय. संक्रांतीचा हा गोडवा तीळगुळाच्या आदानप्रदानाने गोड होतो; परंतु यावर्षी कोरोनाचे संकट अजून तरी जिल्ह्यात कमी झालेले नाही. तेव्हा सामाजिक आंतर ठेवून सण, उत्सव साजरे करावेत, असे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.
लस आली तरी धोका कायम
वाणाला जात असताना किंवा वाण घेण्यासाठी घरात कोणी आले असताना तोंडाला मास्क लावायला विसरू नका. सोबत सॅनिटायझरही अवश्य ठेवा. लस आली म्हणून दुर्लक्ष करू नका. लस घेतल्यानंतरही काळजी घेणे आवश्यक आहे.
१४ जानेवारी पॉझिटिव्ह १० (मृत्यू नाही)
१५ जानेवारी ६ (मृत्यू नाही)
१६ जानेवारी ७ (मृत्यू नाही)
१७ जानेवारी रोजी ९ (मृत्यू नाही)
१८ जानेवारी रोजी १२ (मृत्यू नाही)