फेब्रुवारी आणि मार्च महिन्यांपासून कोरोनाचे रुग्ण मोठ्या प्रमाणात वाढू लागले आहेत. यामुळे शासनाने १४ एप्रिलपासून १ मेपर्यंत पंधरा दिवसांची संचारबंदी लागू केली आहे. त्यामुळे ग्राहक दुकानांवर येईनासे झाले आहेत, असे भाजी विक्रेत्यांनी सांगितले. मंडईत कैरी ३० ते ४०, वांगे १५, चवळी १५, शेवगा २०, गवार १०, टोमॅटो १०, मिरची २०, आलू २०, आद्रक १५, काकडी १०, कोथिंबीर १०, कोबी १० रुपये किलोने विक्री होत आहे.
कोरोना आजारामुळे मंडई बंद ठेवावी लागत आहे. त्यामुळे विक्री न झालेल्या भाज्यांची मोठ्या प्रमाणात नासाडी होत आहे. छोटे विक्रेते ठोक विक्रेत्यांकडून भाज्यांची खरेदी करीत आहेत. परंतु गल्लीबोळातही भाज्यांची विक्री होत नाही. न विकलेल्या भाज्यांवर पाणी शिंपडून त्या घरातच ठेवण्याची वेळ भाजी विक्रेत्यांवर आली आहे. भाज्यांचे भाव गडगडल्याने भाजी उत्पादकांनाही मोठा आर्थिक फटका बसत आहे.
किराणा बाजारातील चढ -उतार
किराणा बाजारात सोयाबीन तेल १४५, सूर्यफूल तेल १६५ याप्रमाणे विक्री झाले, तर गूळ ४०, साखर ३५, शेंगदाणा ११०, मूगडाळ ९०, मसूरडाळ ८०, हरभरा डाळ ७०, उडीद ९०, शाबुदाणा ६० रुपये प्रमाणे विक्री झाल्याची माहिती किराणा दुकानदार अमृत जयस्वाल यांनी दिली.
डाळींब, मोसंबीची आवक कमी
दोन आठवड्यांपासून डाळींब व मोसंबीची आवक कमीच आहे. शहरातील फळबाजारात डाळींब २००, मोसंबी २००, अंगूर ८०, सफरचंद १८०, नारळाचा दर ६० रुपयास नग असा भाव होता. आवक सुरु झाल्यास फळांचा भाव उतरू शकतो, असे विक्रेत्यांनी सांगितले.