हिंगोली जिल्ह्यात पूर्वी ९ केंद्रे होती. आता अकरा झाली आहेत. यात हिंगोली ३, वसमत २, औंढा २, सेनगाव १ व कळमनुरी ३ अशी तालुकानिहाय केंद्रांची संख्या आहे, तर आणखी एक केंद्र मंजूर असून, काहींचे प्रस्ताव मंजुरीत आहेत. सध्या कार्यरत ९ केंद्रांना हजार थाळ्यांची मुभा होती. मात्र, १५ एप्रिलपासून शासनाने मोफत थाळी देण्याचे जाहीर करून दीडपट थाळ्या वाटपाचे आदेश दिले होते. त्यामुळे हिंगोली जिल्ह्यात दीड हजार थाळ्यांचे वाटप करण्याचे आदेश आहेत. जुलैच्या शेवटपर्यंत हे दीडपट वाटपाचे आदेश कायम आहेत. मात्र, जिल्ह्यात सरासरी १,२०० थाळ्यांचेच दररोज वाटप होत होते. प्रतिथाळी ४० रुपये एवढ्या दराने दरमहा सरासरी १४.४० लाख रुपयांची देयके अदा करावी लागतात. मात्र, फेब्रुवारीपर्यंतचीच शिवभोजन थाळ्यांची रक्कम या केंद्रांना पूर्वी मिळाली होती. मार्च, एप्रिल व मे महिन्यांची देयके रखडली होती. त्यामुळे जवळपास ४३.२० लाख रुपयांची रक्कम येणे बाकी होती. आता शासनाने तरतूद दिली असल्याने ही रक्कम अदा करण्यात येत आहे. जिल्ह्यातील चार केंद्रांची देयके मंजूर झाली आहेत. उर्वरित पाचची प्रक्रिया सुरू असल्याचे जिल्हा पुरवठा विभागाकडून सांगण्यात आले आहे.
तीन महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर शिवभोजन थाळ्यांचा मोबदला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 27, 2021 04:19 IST