हिंगोली : कोरोनाचा कहर वाढत असला, तरीही मास्क न लावताच फिरणाऱ्यांची संख्या काही कमी व्हायला तयार नाही. त्यामुळे बुधवारी पुन्हा नगर परिषदेच्या पथकाने कारवाई करून ६७ जणांकडून १३ हजार ४०० रुपयांचा दंड वसूल केला आहे.
गेल्या काही दिवसांपासून नगर परिषदेच्या पथकामार्फत ठरवून दिलेल्या वेळेनंतरही दुकाने सुरु ठेवणे, कोरोनाची चाचणी न करताच दुकाने सुरु ठेवणे, दिलेल्या नियमांचे पालन न करणे यासह विनामास्क फिरणाऱ्यांवरही कारवाई केली जात आहे. बुधवार, २४ मार्च रोजी मुख्याधिकारी डॉ. अजय कुरवाडे यांच्या मार्गदर्शनाखाली विनामास्क फिरणाऱ्या ६७ जणांकडून १३ हजार ४०० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. प्रत्येकी २०० रुपयांचा दंड आकारण्यात आला. या पथकात पंडित मस्के, प्रवीण चव्हाण, नागेश नरवाडे व पोलीस कर्मचारी नीलपत्रवार यांचा समावेश होता.