हिंगोली : जिल्ह्यात माहे जूनअखेर वाणिज्य, औद्योगिक, सार्वजनिक पाणीपुरवठा, पथदिव्यांपोटी ६ हजार १७९ वीजग्राहकांकडे १४३ कोटी २६ लाख ४० हजार रुपये थकबाकी राहिली आहे. यामुळे महावितरणने वसुलीस वेग घेेतला आहे. तर दुसरीकडे वीज बिल न भरल्यास थकबाकीदारांचा वीजपुरवठा त्वरित खंडित केला जाईल, असा इशारा महावितरणने वीज थकबाकीदारांना दिला आहे.
औंढा तालुक्यात वाणिज्यचे ३६८ ग्राहक असून त्यांच्याकडे १६ लाख १५ हजार रुपये थकबाकी आहे. औद्योगिकच्या १८७ ग्राहकांकडे ५४ लाख ९२ हजार रुपये, ग्रामीण पाणीपुरवठ्याच्या १९ ग्राहकांकडे १६ लाख २७ हजार, शहरी पाणीपुरवठा ४ ग्राहकांकडे ६ लाख ३ हजार, ग्रामीण पथदिवे १४५ ग्राहकांकडे २५ कोटी ३७ लाख ४५ हजार, शहरी पथदिवे १९ ग्राहकांकडे ३६ लाख २६ हजार रुपये.
वसमत तालुक्यात वाणिज्य ८०३ ग्राहकांकडे ४२ लाख ९० हजार, औद्योगिकच्या ४१७ ग्राहकांकडे १ कोटी ९७ लाख ७६ , ग्रामीण पाणीपुरवठा १४४ ग्राहकांकडे ४ कोटी २१ लाख रुपये, ग्रामीण पथदिवे २११ ग्राहकांकडे २१ कोटी २५ लाख ३ हजार, शहरी पथदिवे ६८ ग्राहकांकडे २ कोटी ६७ लाख २७ हजार रुपये.
हिंगोली तालुक्यात वाणिज्य १२०९ ग्राहकांकडे ७० लाख ३२ हजार रुपये, औद्योगिकच्या ३४२ ग्राहकांकडे २ कोटी ७ लाख ७४ हजार, ग्रामीण पाणीपुरवठा ६८ ग्राहकांकडे ८१ लाख ११ हजार, ग्रामीण पथदिवे १४१ ग्राहकांकडे १९ कोटी ७० हजार, शहर पथदिवे १७७ ग्राहकांकडे ७ कोटी ४९ लाख ४ हजार रुपये.
कळमनुरी तालुक्यात वाणिज्य ६१४ ग्राहकांकडे २९ लाख ९० हजार रुपये, औद्योगिकच्या २४३ ग्राहकांकडे १ कोटी २७ लाख २७ हजार रुपये, ग्रामीण पाणीपुरवठा १८६ ग्राहकांकडे ७ कोटी १९ लाख ७४ हजार रुपये, शहरी पाणीपुरवठा १ ग्राहकाकडे १ लाख ५७ हजार रुपये, ग्रामीण पथदिवे १४८ ग्राहकांकडे १७ कोटी ९४ लाख ६ हजार रुपये, शहरी पथदिवे २४ ग्राहकांकडे ३९ लाख ९८ हजार रुपये.
सेनगाव तालुक्यात वाणिज्यच्या १९७ ग्राहकांकडे १३ लाख ७८ हजार रुपये, औद्योगिकच्या १९१ ग्राहकांकडे ७९ लाख ८६ हजार, ग्रामीण पाणीपुरवठा ११४ ग्राहकांकडे ६ कोटी १८ लाख ८१ हजार, शहरी पाणीपुरवठा १ ग्राहकाकडे २ लाख २१ हजार, ग्रामीण पथदिवे १३५ ग्राहकांकडे २१ कोटी ५० लाख २९ हजार रुपये, शहरी पथदिवे १ ग्राहकाकडे १८ लाख ९३ हजार रुपये थकबाकी राहिली आहे.
थकबाकी भरण्याचे महावितरणचे आवाहन...
वीजग्राहकांनी वीज वापरल्यानंतर त्याचा भरणा करणे अनिवार्य आहे. परंतु काही ग्राहक असे आहेत जे वीज महिनाभर वापरुन बिल भरणा करीत नाहीत. त्यामुळे महावितरणची थकबाकी वाढत चालली आहे. थकबाकीदारांनी विजेचा भरणा करून महावितरण कंपनीस सहकार्य करावे असे आवाहन कार्यकारी अभियंता रजनी देशमुख, विभागीय लेखापाल एन. ए. मेंडके यांनी केले आहे.
....तर नाईलाजाने वीज खंडित
जूनअखेर महावितरणची विजेची थकबाकी कोटींच्या घरात गेली आहे. वारंवार सूचना देऊनही काही वीजग्राहक वीज वापरून त्याचा भरणा करीत नाहीत. यासाठी महावितरणने वीज वसुलीसाठी निवडक कर्मचारी नियुक्त करून पथक स्थापन केले आहे. येत्या चार-पाच दिवसांत हे नियुक्त केलेले पथक ज्यांनी वीज थकविली आहे त्यांच्याकडे जाणार आहे. त्यावेळेस पथकाला विजेची थकबाकी दिली नाही तर त्या वीजग्राहकांचा तातडीने वीजपुरवठा खंडित केला जाणार आहे. - सुधाकर जाधव, अधीक्षक अभियंता, हिंगोली