या गटांना सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग सुरू करण्यासाठी केंद्र शासनाकडून आत्मनिर्भर भारत अभियानात बीज भांडवल योजना सुरू केली आहे. प्रति महिला ४० हजार अथवा बचत गटास ४ लाखांपर्यंतचे भांडवल देता येते. अनेक बचत गटांनी एकत्र आल्यास किंवा प्राेड्यूसर कंपनीस १० लाखांपर्यंतची रक्कम व्यवसाय, उद्योगासाठी मिळू शकते. यासाठी ऑनलाईन प्रस्ताव सादर करावे लागतात. पहिल्याच वर्षी जिल्ह्यातून औंढा १०२, वसमत ५, हिंगोली १४, कळमनुरी ११, सेनगाव २० असे १५२ प्रस्ताव गेले होते. यासाठी ७६.३८ लाखांच्या कर्जाची मागणी केली होती. मात्र राज्य कक्षाच्या छाननीत यातील औंढा २१, वसमत २, हिंगोली ४, सेनगाव ५ असे ३२ प्रस्तावच पात्र ठरले. यापैकी औंढ्यात १८ गटातील १८ जणांना ७.१८ लाख, वसमतच्या एका गटाला ४० हजार, हिंगोलीतील ३ गटांतील तिघांना १.१० लाख, सेनगावच्या ४ गटातील १३ जणांना ५.२० लाखांचे कर्ज मंजूर झाले आहे. यात ३५ ते ४० हजार रुपये बचत गट सदस्याच्या मागणीनुसार मंजूर झाले आहेत.
या गटांना कर्ज वितरण करताना ते प्रभाग संघ म्हणजे जि. प. गटावर सर्व बचत गटांचा मिळून स्थापन संघाला मिळेल. ते बचत गटाला देतील. तर गट त्या लाभार्थ्याच्या खात्यावर टाकेल. अशी तरतूद केली आहे.
फिरते भांडवल होईल जमा
यापुढे ही रक्कम शासनाकडे परत जाणार नाही. ही रक्कम पुन्हा त्याच मार्गाने ३ टक्के व्याजासह वर्षभरानंतर प्रभाग संघ अथवा जिल्हा संघाकडे येईल. यात व्याज मात्र बचत गटास एक टक्का, प्रभाग संघास एक टक्का तर जिल्हा संघास एक टक्का मिळेल. तर पुन्हा ही रक्कम याच भागातील इतर बचत गटांना दिली जाईल.