बोंडगावदेवी : तालुक्यात शेती हाच एकमेव मुख्य व्यवसाय आहे. जलसिंचनाच्या सोईचा अभाव व निसर्गाच्या अवकृपेने दिवसेंदिवस धान उत्पादनात कमालीची घट येत आहे. यातून दरवर्षी गावात मंदीचे चक्र फिरत असल्याचे दिसून येत आहे. यावर्षी पावसाच्या लहरीपणासोबतच कीडीचा प्रादुर्भाव होत आहे. त्यामुळे उत्पन्नात घट होण्याची शक्यता आहे.औद्योगिक प्रक्रियेत एखाद्या वस्तुला निर्माणाधीन अवस्थेमध्ये लागलेला खर्च धरुन ती वस्तू नफा ठेवून बाजारात विकली जाते. वस्तुंची किंमत ठरविण्याचा पूर्णत: हक्क त्या उत्पादकाचा असतो. त्याने ठरविलेल्या किमतीवर गदा येत नाही. परंतु धानाच्या भावात ती प्रक्रिया नाही. उत्पादन खर्चावर आधारीत धानाला भाव मिळत नसल्याने कर्जाच्या बोज्याखाली शेतकरी वर्ग पिकला जात आहे. धान उत्पादकांच्या व्यथा, दु:ख, दरिद्री दूर करण्यासाठी जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींनी शासन दरबारी धानाला उत्पादन खर्चावर आधारित भाव मिळण्यासाठी रेटा धरण्याची आज गरज आहे. पूर्व विदर्भातील धान पिकविणारा शेतकरी गेल्या काही वर्षापासून सातत्याने आर्थिक संकटात सापडला आहे. देशात सर्वत्र अन्नधान्याचा विपूलसाठा उघड्यावर पडून सडण्याच्या अवस्थेत असताना देखील धान उत्पादक मात्र अत्यंत हलाखीचे जीवन जगताना दिसत आहे. आलेल्या संकटावर मात करुन शेतकरी वर्ग धानाचे उत्पादन घेतो. बी-बियाण्यांच्या वाढलेल्या किंमती, रासायनिक खतांची झालेली दरवाढ, कीटकनाशक औषधींच्या वाढलेल्या विक्रमी किंमती, मजुरी, नांगरणी-वखरणी, रोवणी, निंदन, धानकटाई, चुरणा करण्यासाठी तसेच धान विक्रीसाठी माराव्या लागणाऱ्या येरझाऱ्यासाठी भरमसाठ पैसे मोजावे लागतात. धानाचे उत्पादन शेतकऱ्यांच्या घरात येईपर्यंत चार महिन्यांच्या कालावधीत होणाऱ्या आर्थिक गुंतवणुकीने सामान्य शेतकऱ्यांचे कंबरडे मोडते. घरात धानाचे पीक येते, परंतु कर्ज असल्याने पडक्या भावाने धानाची विक्री करावी लागते. यावर्षी सुरूवातीच्या काळात पावसाने दांडी मारल्यामुळे शेतकऱ्यांचे पऱ्हे वाया गेले. त्यामुळे अनेकांना दुबार पेरणी करावी लागली. नंतरही रोवणीयोग्य पाऊस झाला नसल्याने उत्पन्न घटणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या नशिबी दरिद्री कायम घर करुन असल्याचे दिसत आहे. (वार्ताहर)
यावर्षी धानाच्या उत्पन्नात घट होणार
By admin | Updated: September 6, 2014 23:55 IST