सुकडी-डाकराम : सकाळी बरसलेल्या दमदार पावसामुळे पडलेल्या घराच्या भिंतीखाली दबून महिला ठार झाली. खडकी-डोंगरगाव येथे गुरुवारी (दि.९) सकाळी ६.३० दरम्यान ही घटना घडली. मृत महिलेचे नाव धनवंता रवींद्र भलावी (३९) असे आहे.
प्राप्त माहितीनुसार, गुरुवारी (दि.९) सकाळी ६.३० दरम्यान रवींद्र भलावी, धनवंता भलावी व मुलगी घरी होते. धनवंता दुसऱ्यांच्या मजुरीवर जाण्यासाठी स्वयंपाक करीत असताना जोरदार पावसाला सुरुवात झाली व त्यांच्या अंगावर घराची भिंत कोसळली. रवींद्र यांनी आरडाओरडा करून गावकऱ्यांना बोलविले असता गावकऱ्यांनी टिकास, सब्बलच्या मदतीने भिंत फोडून धनवंत यांना बाहेर काढले व येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात नेले. मात्र त्यांना तिरोडा येथील उपजिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले असता डॉक्टरांनी मृत घोषित केले. त्यानंतर धनवंता यांच्या मृतदेहाची उत्तरीय तपासणी करण्यात आली. घटनेची माहिती तलाठी राऊत तसेच तिरोडा पोलिसांना देण्यात आली. तलाठी राऊत यांनी मोका पंचनामा करून तहसीलदारांकडे सोपविला. धनवंता यांच्या परिवाराला शासनाकडून १० लाख रुपयांची आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी गावकऱ्यांनी केली आहे.
-----------------------------
अन्यथा रवींद्रही आले असते तावडीत
सकाळी कारले कापत बसलेल्या धनवंता यांच्या जवळच रवींद्र बसले होते. मात्र धनवंता यांनी रवींद्रला डाळीचा गंज आणण्यास सांगितल्याने ते गंज आणण्यासाठी दुसऱ्या खोलीत गेले. तेवढ्यातच भिंत पडली व धनवंतासाठी काळ ठरली. जर रवींद्र गंज आणण्यासाठी उठून गेले नसते तर तेही भिंतीखाली दबले असते. तसेच त्यांच्या दोन मुली मामाच्या गावी गेल्या असून एक मुलगी घरात होती.