विषयतज्ज्ञांनी घेतला पुढाकारगोंदिया : शासन नियमानुसार एकही मुल शिक्षणापासून वंचित राहू नये. जे शैक्षणिक प्रवाहात येऊ शकत नाही त्यासाठी शासन विविध उपाययोजना आखते. त्या अनुषंगाने गोरेगाव येथील विषयतज्ञांच्या परिश्रमातून येथील चितौड समाजातील २७ मुले शैक्षणिक प्रवाहात आणण्यात आली.ज्या वयात आशावाद ठेऊन स्वप्न फुलवायचे त्या वयातील निरागस बालकांना वडीलांच्या भटकंतीमुळे शिक्षणापासून वंचित रहावे लागते. शिक्षणाचा हक्क अशा निरागस बालकांना मिळावा यासाठी येथील विषयतज्ञाने प्रयत्न आशादायी आहे. उत्तरप्रदेश, मनसर (रामटेक) या शहरातून जडी-बुटी विकने व्यवसाय करणारी काही कुटुंब गेल्या दहा दिवसापासून गोरेगावात डेरेदाखल झाली आहेत. या डेऱ्यात ७ ते १४ वर्ष वयोगटातील काही मुले दिसली ही बाब लक्षात घेऊन येथील विषयतज्ञ सुनील ठाकुर, भास्कर बहेकार, ओमप्रकाश ठाकरे, गोविंद ठाकरे, शालिनी रहांगडाले यांनी ह्या कुटुंबांना प्रत्यक्ष भेट देऊन तेथील पालकांना शिक्षणाचे महत्व पटवून दिले. शासनाच्या विविध योजनाची माहिती दिली व लगेचच गोरेगाव येथील शहीद जाम्या-तिम्या जि.प. हायस्कूल व प्राथ. शाळा गोरेगाव येथील मुख्याध्यापक एस.एस. आकरे व ए.ई.चाकाटे, स.शि. अनमोल उके, व्यवस्थापन समितीचे नंदलाल सोनवाने व दुर्वराज वैद्य, जगत महाविद्यालयाचे एन.एस.एस. प्रमुख जी.बी. बघेले यांच्या मदतीने एकूण १८ विद्यार्थी हाय.गोरेगाव व ९ विद्यार्थी प्राथ. शाळा गोरेगाव येथे नाव दाखल करण्यात आले. सदर विद्यार्थ्यांना विषयतज्ञाकडून वह्या व पेन देण्यात आले. या शिक्षण वंचित बालकाना प्रवेशित करण्यासंबंधाने जिल्हा शिक्षण-प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य प्रशांत डवरे, गटसमन्वयक टी.बी. भंडारकर यांचे मार्गदर्शन समयोचित ठरले. (प्रतिनिधी)
भटकणारी शाळाबाह्य मुले शिक्षण प्रवाहात
By admin | Updated: February 2, 2016 01:42 IST